Breaking News

51 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

औरंगाबाद, दि. 24, सप्टेंबर - औरंगाबाद तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीस सुरुवात झाली असून अर्ज भरण्यसाठी शुक्रवारी शेवटच्या  दिवशी मोठी गर्दी झाली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पण, पितृपक्ष व परिपूर्ण माहितीअभावी पहिले दोन  दिवस एकही अर्ज दाखल झाला नाही. सोमवारनंतर ऑनलाइन अर्ज व परिपूर्ण संच दाखल करण्यासाठी सुरुवात झाली. सरपंचपदासाठी शुक्रवारपर्यंत 215, तर  सदस्यासाठी 1089 अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली. वेळ संपल्यानंतरही उशिरापर्यंत गर्दी  होती. अंतिम चित्र छाननीनंतर स्पष्ट होणार आहे. तालुक्यातून 51 सरपंचपद व 155 भागातून 429 सदस्य निवडले जाणार आहेत. त्यात बहीरगाव, नाचनवेल,  हस्ता, मेहगाव, वासडी, आडगाव (पिशोर) या प्रमुख गावांचा समावेश आहे. सरपंचपदासाठी तालुक्यात खुल्या प्रवर्गातून 14, महिला खुला प्रवर्ग 6, ओबीसी खुला  प्रवर्ग 12, ओबीसी महिला 8, अनुसूचित जाती खुला प्रवर्ग 3, अनुसूचित जाती महिला 5, अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग 2, अनुसूचित जमाती महिला 1, असे  आरक्षण आहे.