Breaking News

अर्बन बँकेतील गांधीगिरीचे गौड बंगाल - बाहुत नाही बळ म्हणे पहिलवानाच्या पाठीवर काढील वळ आवतान दोनशे शाखांचे, प्रत्यक्षात दोन खोट्या शाखांची बनवेगीरी

अहमदनगर/ विशेष प्रतिनिधी
राव बहादूर चितळे यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे धिंडवडे काढून नगर अर्बन बँकेला मल्टीस्टेटचा देण्याची गोंडसगिरी फसवी असल्याची अनुभूती प्रत्येक सभासदाला आल्याने सहकाराच्या मातीत उतरलेला हा पहिलवान फोफशा असल्याचे गेल्या पाच सात वर्षातील रंगलेल्या गैरकारभाराच्या फडातून निष्पन्न झाले आहे. सन 2014-2019 या पाच वर्षात अर्बन बँकेच्या दोनशे शाखा काढण्याची बोंब दोन बनावट शाखांवर अडकून पडल्याने या पहिलवानाच सहकाराच्या मातीवर खेळण्याची पात्रता नाही. हे सोदाहरण सिध्द झाले आहे.
मातीवरच्या कुस्तीत दोन पहिलवान समोरासमोर भिडतांना प्रतिस्पर्ध्याला आव्हान देत असतात. एक पहिलवान नक्कीच या आव्हानाचा अधिकारी असतो. दुसरा मात्र शारिरिकदृष्ट्या धडधाकट दिसत असला तरी आतून मात्र पोकळ असतो तितकाच कावेबाज असतो. आपल्या ग्राम्य भाषेत अशा पहिलवानाला फोफशा म्हणतात. नगरकरांचा अभिमान असलेल्या नगर अर्बन को - ऑप बँकेला मल्टीस्टेटचा दर्जा मिळवून देशभर दोनशे शाखांचे जाळे निर्माण करण्याची वल्गना कुस्तीच्या आखाड्यात फोफशा पहिलवानाने दिलेल्या आव्हानासारखी ठरली आहे.
वास्तविक नगर अर्बन बँकेला मल्टीस्टेट करण्याचा अट्टाहास सहकारातील पट्टीचा पहिलवान करील, अशी तत्कालीन परिस्थिती नक्कीच नव्हती. तरी देखील तत्कालिन सन 2008 ते 2013 या कालावधीत या बँकेचा कारभार नव्याने हातात घेतलेल्या करभार्‍यांनी मल्टीस्टेटचा हट्ट पुर्ण केला. त्याची कारणमिमांसा या पुर्वीच्या लेखमालेत तपशीलवार केली आहे. आपले कृष्णकृत्य झाकण्यासाठी मल्टीस्टेटचा प्रपंच मांडतांना सभासदांवर खोट्या आश्‍वासनांचा मारा केला, कुवतीपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न केला हात पाय मोडून घेण्याची आफत ओढवते.
4 एप्रिल 2013 रोजी बँकेला मल्टीस्टेटचा दर्जा मिळाल्याने हर्षाने गर्भगळीत झालेल्या कारभार्‍यांचे अवसान उतू आले आणि रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. सन 2014 ते 2019 या काळात बँकेच्या दोनशे शाखांचे जाळे विणून देशभरात बँकेचा विस्तार करू करू अशी वल्गना केली. हा केवळ आभास आहे, याची कल्पना जाणकारांना तेंव्हाच आली होती. सारे जग आपला व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मुंबईत पाय ठेवायला जागा मिळावी म्हणून धडपडते त्या मुंबईत बँकेची शाखा उघडण्याची हिम्मत दाखवली नाही. मुंबई आणि नगर जिल्हा वासियांचे व्यावसायिक भावनिक ऋणानुबंध लक्षात घेता बँकेची शाखा असणे अपरिहार्य होते. त्यातून बँक आणि सभासदांची उन्नती निश्‍चित दिसत असताना शाखा निर्माण करण्याची सद्बुध्दी सुचली नाही. ते काय दोनशे शाखा उभारणार, अशी चर्चा तेव्हापासून सुरू आहे. थोडक्यात हा पहिलवान फोफशा आहे याची झलक तेव्हाच पहायला मिळाली होती.

दोनशे शाखा निर्माण झाल्या नाहीत. उलट महाराष्ट्राबाहेर ज्या दोन शाखा दाखविल्या जात आहेत, त्यात सभासदांची आणि रिझर्व्ह बँकेसह केंद्र शासनाची फसवणूक झाली आहे.
बँकेची शाखा मुंबई मध्ये उघडणे चे टाळून सूरत, अहमदाबाद आणि बडोदा येथे शाखा उघडण्यासाठी आटापिटा सुरू केला. नगर अर्बन बँकेचाअहमदाबाद मध्ये एकही सभासद नाही. अहमदाबाद येथे 165 सभासद आधी कागदावर दाखविण्यात आले होते. या सभासदांशी काही जाणकारांनी आणि बँकेचे हित जपणार्‍या काही सभासदांनी स्वतः संपर्क साधला तर या मधील 139 पत्ते बोगस निघाले. नंतर खासदारांनी बँकेचे अधिकारी पाठवून सूरत व अहमदाबादमध्ये 300ते 400 सभासद केले. 
एवढेच नव्हे तर सूरतसाठी 300 सभासदांकरिता एक स्पेशल संचालक देखील दिलेला असताना देखील गेल्या चार वर्षात सूरत अहमदाबाद मधून बँकेला एक पैशाचा व्यवसाय मिळाला नाही.(क्रमशः)