Breaking News

कोळसा खाण खचली, 7 कामगारांचा मृत्यू, 40 जण ढिगार्‍याखाली

रांची, दि. 30 - झारखंडमध्ये जमीन खचल्याने कोळसा खणीत भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 40 कामगार अडकल्याची भीती आहे. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील ललमाटिया परिसरात गुरुवारी ही घटना घडली.
भोडाय कोळसा खणीत काम सुरु होतं. मात्र यावेळी जमीन खचल्याने एकच खळबळ उडाली. खणीत अनेक कामगार ढिगार्‍याखाली दबले. त्यापैकी 7 मृतदेह  बाहेर काढले आहेत, तर आणखी 40 कामगार दबल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. कामगारांशिवाय मोठी यंत्रसामुग्रीही  ढिगार्‍याखाली दबली आहे. यामध्ये 20 वोलबो, एक डोजर, सहा पोकलेन, एक बोलेरोचा समावेश आहे. सध्या एनडीआरएफने बचावकार्य सुरु केलं आहे.कोळसा  खाणीत जमिनीत आत 200 फुटांवर काम चालू होतं. त्यामुळे या अपघाताची तीव्रता किती भयानक असेल, याचा अंदाज येऊ शकेल. या दुर्घटनेमुळे झारखंडवर  दु:खाचं सावट आहे.