गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार : एक हजार ९६३ धरणातील १.४ कोटी घनमीटर गाळ काढला


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या जनसहभागाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षभरात १ हजार ९६३ धरणातील १.४ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून सुमारे ५० हजार शेतकऱ्यांच्या शेतात मोफत गाळाचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी दिली.

जनसहभागाने धरणातील गाळ काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या निर्देशावरून मे 2017 मध्ये प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित एका बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

येत्या ३१ मेपर्यंत सुमारे दोन हजार धरणांमधून गाळ काढला जाणार असल्याचे श्री. चहल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्यातील धरणांमधून गाळ काढून धरणांची पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि पर्यायाने त्याभागातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागणार आहे. त्याच बरोबर हा धरणातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्याने त्यांच्या शेतातील जमीन अधिक सुपीक होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या कामाच्या यशस्वीतेत शेतकऱ्यांचा आणि स्वयंसेवी संस्थांचा सिंहाचा वाटा आहे.

या कामात आतापर्यंत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत ८९ लाख २ हजार ३३६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जनतेने स्वयंप्रेरणेने सहभागी होऊन यास लोकचळवळीचे रुप मिळावे यासाठी ठिकठिकाणी जनप्रबोधन, कार्यशाळा यांच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे.