Breaking News

अग्रलेख धक्कातंत्र !


2014 च्या लोकसभा निवडणूकीनंतर भाजपने ज्याप्रमाणे अनेक निर्णय घेत आश्‍चर्याचा धक्का दिला, तसाच धक्कातंत्राचा वापर भाजप 2019 च्या निवडणूकांत करणार असल्याचे दिसून येत आहे. येणार्‍या लोकसभा निवडणूकीत विद्यमान 50 टक्के खासदारांचे तिकीट कापण्याचे संकेत भाजपच्या गोटातून मिळत आहे. भाजपचा निवडणूक ांतील घसरता आलेख, मोदी लाट ओसरल्यामुळे येणार्‍या निवडणूका कशा लढवाव्यात हा भाजपसमोर प्रश्‍न आहे. भाजप खासदार व मंत्रीमोहदयांचे बेताल वक्तव्ये, व पंतप्रधानांचे भरमसाठ आश्‍वासने, मात्र अंमलबजावणीचा दुष्काळ यामुळे, भाजपची कामगिरी सातत्याने घसरत चालली आहे. काँगे्रस सत्तेत असतांना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर भाजपाने मौनी पंतप्रधान असा शिक्का मारला होता. मात्र डॉ. मनमोनिसिंग यांनी अनेक वेळेस पत्रकारपरिषदा घेत जनतेच्या मनांतील प्रश्‍नांची उत्तरे पत्रकारांना दिली होती. मनमोहनसिंग कमी संवाद साधत, मात्र तो परिणामकारक संवाद असे. त्यांच्यवर सातत्याने टीका झाली. मात्र आजची परिस्थती बघितली असता, त्यावेळेस टीका करणारे नरेंद्र मोदी आज पंतप्रधान असतांना कोणत्याही विषयावर भाष्य करण्यास तयार नाही, असेच दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी एकही पत्रकारपरिषद घेत जनतेच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. याउलट सभांमधून आपली एकेरी बाजू पंतप्रधानांनी अनेक वेळेस मांडली. मात्र प्रश्‍नांना सामोरे जाण्याचे नेहमीच पंतप्रधानांनी टाळले आहे. 
त्यामुळे मोदी यांच्याविषयी जनतेच्या मनात एक नकारात्माक भावना निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील निवडणूका जिंकणे सहज सोपे नाही, याची भाजपला जाणीव आहे. 
पुन्हा एकदा सत्तेचा सोपान मार्ग सर करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष धक्कातंत्र अवलंबण्याच्या तयारीत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विद्यमान 150 खासदारांना तिकीट नाकारले जाण्याची दाट शक्यता आहे. भाजप पक्ष खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन असून, भाजपच्या गोटातून खासदारांच्या तिकीट वाटपाचे वृत्त समोर आले आहे. वरिष्ठ भाजप नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना तिकीट नाकारले जाऊ शकते. प्रकृती अस्वस्थाचे कारण त्यासाठी सांगितले जाते. तन्वी सेठ प्रकरणात स्वराज यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर स्वराज वादाच्या भोवर्‍यात सापडल्या होत्या. यासोबतच स्मृती ईराणी यांच्याकडून दोन वेळेस चांगली खाती काढून त्यांची दुय्यम खात्यावर बोळवण करण्यात आली. भाजप पक्ष आपल्याच पक्षातील मंत्री व खासदारांवर त्यांच्या कामाच्या पध्दतीवर नाराज आहे. यातच जनतेचा रोष वाढत चालला आहे. यामुळे नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची खेळी भाजप खेळण्याच्या विचारात आहे. खासदार उमा भारती यांच्या कामगिरीवर पक्षनेतृत्व नाराज आहे. काही दिवसांपूर्वीच उमा भारती यांच्याकडून खात्याचा पदभार काढून घेण्यात आला होता. तिकीट मिळविण्यासाठी वय हा काही नेत्यांना अडसर ठरू शकतो. त्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, करिया मुंडा, शांता कुमार, बीसी खंडूरी यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या नावावर देखील पक्षाकडून विचार केला जाऊ शकतो. सामाजिक अशांतता हा भाजपच्या मार्गांतील मोठा अडसर आहे. तसेच देशातील सामाजिक शांतता सुरळित राहावी, दोन समाजात तेढ माजणार नाही, यासाठी केंद्राकडून काही आश्‍वासक पावले उचलण्याची गरज होती. मात्र या जातीय दंगलीला पुरक, वक्तव्ये संबधित पक्षांच्या लोकप्रतिनिधीकडून होत होते. त्यामुळे मागे पुरस्कार वापसी सारखी मोहीम देशभरातील साहित्यीक, क लाकार यांनी राबविली होती. त्यांनतर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील कलमे, कमकुवत केल्याचा आरोप भाजपावर होत आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणूका भाजपसाठी मोठया आव्हानात्मक असेल, यात शंकाच नाही.