Breaking News

भुयारी गटार व मलनिस्सारण प्रकल्पाच्या निविदेला शासनाची मंजूरी


केंद्र शासनाच्या अमृत अभियाना अंतर्गत मनपाला मंजूर असलेल्या 129 कोटीच्या भुयारी गटार व मलनिस्सारण प्रकल्पाच्या निविदेला राज्य शासनाच्या समितीने अंतिम मंजूरी दिल्याची माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली.107 कोटीची पाणी योजना आणि आता नव्याने काम सुरु होत असलेली भुयारी गटर योजना या दोन्ही योजना शहराला दिशा दर्शक ठरणार आहे. या माध्यमातून शहराचा पुढील 40 वर्षाचा पाणी व ड्रेनेजचा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे. महापौर म्हणून काम करताना शहराच्या दृष्टिने हितकारक व शहराच्या विकासाला दिशा देणारे प्रकल्प माझ्या कार्यकाळात मार्गी लावल्याचे समाधान होत असल्याचे कदम यांनी म्हटले. तसेच या दोन्ही योजनांचे उद्घाटन आचार संहिता शिथील झाल्यानंतर करण्यात येणार आहे असे महापौर यानीं सांगितले.
महापौर कदम पुढे म्हणाल्या की, मनपा स्थापन झाल्यापासून शिवसेनेने शहरात विकास कामांनाच प्राधान्य दिले आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापासून मनपाचा कारभार पाहता अनेक रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. शहराच्या आगामी 40 ते 50 वर्षाच्या दृष्टिने महत्त्वकाक्षी असलेल्या पाणी योजना व भुयारी गटार योजना अनेक अडथळे पार करुन मार्गी लागल्या आहेत. विकास कामांच्या गप्पा मारणार्‍यां काहींनी सत्तेत असल्याचा गैरफायदा घेत या योजना मार्गी लागू नयेत यासाठी वारंवार खोडा घालण्याचा प्रयत्न केला.
भुयारी गटार योजनेतही ठेकेदरांची तळी उचलणार्‍या नेत्याने स्वतःच्या स्वार्थी पोटी तक्रारी करुन योजनेत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. भुयारी गटार व मलनिस्सारण प्रकल्पाच्या या योजनेचे काम मार्गी लागल्यानंतर सीना नदी पात्रातील पाण्याचे प्रदूषण थांबण्यास मदत होणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाकडे सुनावणी सुरु आहे. लवादानेही योनजेचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे योजनेच्या निविदेला लवकरात लवकर मंजूरी देण्याची मागणी केली होती. यानंतर शासनाच्या राज्यस्तरीय समितीने या योजनेच्या निवेदला अंतिम मंजूरी दिलेली आहे. या कामांचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असल्याचीही त्या म्हणाल्या.
भुयारी गटार व मलनिस्सारण प्रकल्पाच्या निवेदला राज्य शासनाची अंतिम मंजूरी मिळाली असून लवकरच यामधुन पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना या दोन्ही प्रकल्पाच्या कामांचा शुभारंभ हा आचारसंहिता संपल्यावर होणार असल्याचे कदम यांनी सांगितले आहे.