भविष्यात जमीन आरोग्यपत्रिका असल्याशिवाय खते मिळणार नाही
माती वाचली, तर देश वाचेल. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, निरोगी आयुष्य जगता यावे म्हणून प्रयत्न करतो. सध्याच्या काळात माणसाचे जीवनमान कमी होत चालले आहे. परंतु मातीला अनंत पिढ्या जगायचे आहे. तिचे आरोग्य पाहिले पाहिजे. असमतोल खताचा वापर, पाण्याचा योग्य वापर यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. भविष्यात जमीन आरोग्य पत्रिका असल्या शिवाय खते दिली जाणार नाहीत, असे प्रतिपादन आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्हाटे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा अंतर्गत किसान क्रांती सेंद्रिय शेतीगट, माळवडगाव येथे आयोजित जमीन सुपिकता व खत व्यवस्थापन कार्यक्रम प्रसंगी तेे बोलत होते. यावेळी म.फु.कृ.वि.चे मृद शास्त्रज्ञ अनिल दुरगुडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे, ता,कृ.अ. सतीश शिरसाठ, सरपंच बाबासाहेब चिडे, उपसरपंच गिरीधर आसने, तुपे, कृषी सहाय्यक ए. यू. काळे, बीटीएम मीनाक्षी बडे, एटीएम मानकर, सुनील आसने, प्रमोद आसने आदींसह शेतकरी उपस्थित होते.बर्हटे पुढे म्हणाले की, खतावर शासन लाखो रुपये देत आहे. ते जपून वापरले पाहिजे. जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करावा. पाण्याची पातळी घटत चालली आहे. देशात पहिले राज्य आहे की भुजल अधिनियम कायदा लागू केला आहे. हा निर्णय शासनाने घेतला आहे. तो गावकर्यांच्या भल्यासाठीचा आहे. गाव बळकट व्हायला हवे. उकिरडा मुक्त गावची संकल्पना राबवली पाहिजे.