प्रत्येक कृत्याचा हिशोब अल्लाह घेईल
सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करताना विश्वस्तांच्या भावनेने कार्य करण्याची गरज असते. एखादे पद आपणास मिळाल्यास आपली जबाबदारी अधिक वाढते. हजरत उमरबीन अब्दुल अजीज इस्लामी राजवटीत गवर्नर होते. सरकारी खजिन्यातील कोणतीही वस्तू स्वतःसाठी कधी वापरत नसत. त्यांचा स्वतःचा वेगळा दिवा होता. शासकीय काम क रताना सरकारी दिवा व खासगी काम करताना स्वतःचा दिवा वापरीत. स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी सरकारी खजिन्यातील एक पैसाही कधी खर्च केला नाही, अशी उदाहरणे आज तर पहावयासही मिळत नाही. आज सत्तेच्या पदांचा सर्रास गैरवापर केला जातो. संस्था ताब्यात असतील तर तेथून नको तो खर्च केला जातो. मशिदी, मदरसे यावर काम करणार्यांनीच पारदर्शकपणे कार्य करणे गरजेचे आहे. निनावी पत्रे पाठवून विनाकारण गैरसमज निर्माण करण्यापेक्षा संबंधितांना समक्ष जाब विचारण्यात गैर काहीच नाही. तसेच इतरांनी विचारण्यापेक्षा आपणच एखाद्या कार्यासाठी झालेला जमाखर्च जाहीर करून टाकल्यास वेगळी चर्चा होत नाही. आपण केलेला कारभार स्वच्छ असेल तर हिशोब जाहीर करण्यात अडचण काय? शेवटी आपण केलेल्या प्रत्येक कार्याची नोंद अल्लाहकडे असून, आपल्याला प्रत्येक कृत्याचा हिशोब अल्लाहला द्यावाच लागेल, याची नोंद प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे.
प्रासंगिक
आबीद दुलेखान
मो. 9860477869