Breaking News

शेतकरी आंदोलकांचा रास्तारोको पोलिसांनी बंद पाडला

संगमनेर/प्रतिनिधी - दूधाला प्रतीलिटरमागे ७ ते १० रुपयांचे अनुदान मिळावे, अतिरिक्त दुध शासनाने खरेदी करुन त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, शेतीमालाला उत्पादन खर्चावरती आधारित वाढीव पन्नास टक्के हमी भाव मिळावा, ६० वर्षापुढील शेतकऱ्यांना पेंन्शन योजना लागू व्हावी, शेतकऱ्याचे संपूर्ण वीज बिल माफ करावे आदी मागण्यांसाठी संगमनेरमधील शेतकरी बांधवांच्यावतीने बसस्थानक चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनावेळी बळाचा वापर करत सात आंदोलकांना ताब्यात घेत सदरचे आंदोलन पाडले. 

शासनाने निर्धारित केलेला २७ रुपयांचा दर दुधाला मिळावा आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी रविवारी सकाळी नाशिक पुणे मार्गावर संगमनेरमध्ये बसस्थानकाबाहेर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर आेतण्यासाठी आणलेले दुध आणि टोमॅटो तसेच परत न्यावे लागले. अटकेवेळी अनेक आंदोलकांनी तेथून काढता पाय घेतला. यामध्ये शरद नारायण थोरात, संतोष मधुकर रोहोम, कैलास दत्तात्रेय वाकचौरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, रमेश काळे, दिपक वाळे, राजाभाऊ देशमुख, भास्करराव दिघे, शांताराम शिंदे, बापु गुळवे, बाबासाहेब शिंदे, अशोक गुळवे, सदाशिव हासे आदींचा समावेश होता. आंदोलन सुरु होताच काही वेळातच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली. पंचवीस-तीस आंदोलकांपैकी सात आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नायब तहसिलदार अशोक रंधे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.