Breaking News

जलवाहतूकीसाठी विस्तीर्ण खाडी किनार्‍याचा फायदा घेतला पाहिजे - विनिता राणे

डोंबिवली, दि. 13, मे - कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रातील वाहतुकीची कोंडी मुक्त करण्यासाठी जलवाहतूक होणे गरजेचे आहे. जलवाहतूकीसाठी लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनार्‍याचा फायदा घेतला पाहिजे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण या सर्वांनी जलवाहतुक योजनेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तरीही जलपर्यटनांचा लाभ घेता यावा म्हणून जुन्या डोंबिवली गणेश घाट येथून जलवाहतूक करणार्‍या खासगी बोटीचा आनंद डोंबिवलीकरांना घेता येणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नवनिर्वाचित महापौर विनिता राणे यांनी शनिवारी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून खाजगी पर्यटन बोटीचे उद्घाटन केले.
डोंबिवली - मुंब्रा अलीमघर डोंबिवली या मार्गावर ही फेरी बोट खाडीतून मार्गक्रमण करणार आहे. जलवाहतूक बोटीसाठी 25 मे पर्यंत प्रायोगिक तत्वावर सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. सुमारे 25 ते 50 रुपये भाडे प्रती प्रवासी आकारण्यात येणार आहे. आगामी काळात मुंब्रा भागातही ही प्रवासी फेरी बोट नेण्याचा विचार आहे. खाडी पलीकडील नागरिकांसाठी या जल वाहतूक सुविधेचा नक्कीच फायदा होईल. यावेळी विलास ठाकूर म्हणाले कि, जल वाहतूक बोटीतून प्रवासाचा आनंद घेणार्‍या प्रत्येकाच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. या जलबोटीमुळे डोंबिवलीकरांची पावले जुनी डोंबिवली गणेश घाटाकडे नक्कीच वळणार आहेत.