Breaking News

ग्रामीण जनतेचे जीवन टँकरवर अवलंबून

डोंबिवली, दि. 13, मे - कल्याण डोंबिवली महापालिकेतील डोंबिवली जवळील 27 गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्‍न उग्ररुप धारण करत असून नांदिवली-पंचानंद परिसरात रेाज 40 ते 50 टँकरने पाणी पुरवठा होत असून नागरिकांचे जीवन टँकरवर अवलंबून आहे. या भागातील पाणी टंचाईला वितरण व्यवस्था कारणीभूत असल्याचे अधिकारी व नगरसेवकही मान्य करत आहेत.

नांदिवली-पंचानंद भागात प्रभाग 112 (नांदिवली पंचानंद) पी अ‍ॅन्ड टी कॉलनी (113) व नांदिवली मिनल पार्क (115) या तीनही प्रभागातून शिवसेनेच्या महिला नगरसेविका विजयी झाल्या आहेत. हे तीनही प्रभाग शहराला खेटून असल्याने व या भागाची लोकवस्ती झपाटयाने वाढत आहे. मोठ मोठी संकुले झाली आहेत. पण नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 27 गावांसाठी रोज 45 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे औद्योगिक पाणी पुरवठा मंडळ सांगत आहे. पण मध्येच होणारी पाण्याची गळती, बुस्टर लावून पाणी खेचण्यात येत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. औद्योगिक विकास मंडळ पाणी पुरवठा करते पण वितरणाची जबाबदारी कल्याण डोंबिवली महापालिकेची असल्याने व तीच व्यवस्था नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
महापालिका क्षेत्रात ज्याप्रमाणे पाणी साठवण टाक्या आहेत तशी व्यवस्था नाही तसेच मोठ्या प्रमाणात बुस्टरचा वापर होत असल्याने जे नागरिक त्याचा वापर करत नाहीत त्याना पाणी मिळत नाही. त्याचप्रमाणे उघडपणे होणारी पाण्याची चोरी, गळती अशीही कारणे पाणी टंचाइ्रला जबाबदार आहेत. नांदिवली पंचानंदमधील एक महिला हिरा सहाणे या 50 वर्षांच्या असून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रोज दुपारी विक्रोळीला आपल्या मुलीकडे जातात व सोबत पाण्याचे बॅरल, बाटल्या भरुन पाणी घेऊन येतात अशी माहिती नगरसेविका रुपाली म्हात्रे यांनी दिली. राज्य शासनाने या भागातील पाणी पुरवठा करण्यासाठी 182 कोटींची अमृत येाजना तयार केली असून ही योजना प्रत्यक्ष अमंलात येण्यास दोन वर्षे लागणार आहेत. तोपर्यत या नागरिकांचे जीवन टँकरवर अवलंबून रहाणार आहे हे नक्की.