Breaking News

18 वर्षानंतर 32 गाळेधारकांना मिळाले हक्काचे दुकान !


ठाणे, दि. 26, मे - सुमारे 18 वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणामध्ये बाधीत झालेल्या सुमारे 32 गाळेधारकांना आ. जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे हक्काचे गाळे मिळाले आहेत. नुकतीच, या गाळेधारकांना आ. आव्हाड, ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले. यावेळी सर्वच गाळेधारकांनी आ. आव्हाड यांचे आभार मानले. आम्हाला आमचे गाळे मिळतील की नाही, याबाबत आम्ही साशंकच होतो. मात्र, आ. आव्हाड यांच्यामुळेच आम्हाला गाळे मिळाले, अशी प्रतिक्रिया यावेळी गाळेधारकांनी व्यक्त केली.
 
18 वर्षांपूर्वी काका नगर भागात रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहीमेमध्ये बाधीत झालेल्या गाळेधारकांचे पुन:र्वसन करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, गेली अनेक वर्षे हे गाळेधारक आपल्या हक्काच्या गाळ्यांमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असूनही त्यांना न्याय मिळत नव्हता. ही बाब कळवा- मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, नगरसेवक शानू पठाण आणि आशरीन राऊत यांना समजताच त्यांनी आ. आव्हाडांना ही बाब सांगून संबधितांना न्याय देण्याची मागणी केली. आ. आव्हाड यांनी या संदर्भात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा करुन काका नगर येथे उभारण्यात आलेल्या नवीन मार्केटमध्ये 32 गाळेधारकांना गाळे दिले. या सर्वांना आ. आव्हाड, आयुक्त जयस्वाल आणि आनंद परांजपे यांच्या हस्ते चावी वाटप क रण्यात आल्या.