आयुष्य कसे जगावे? पितृ वचनाचे पालन कसे करावे? हे आठ हजार वर्षांंपूर्वी आमच्या पूर्वजांनी प्रभू श्रीरामाकडून शिकलेले आहे. यासाठी अयोध्येत राम मंदिर बांधणे खूप आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील सिहोरा गावात बोलताना येथे केले.
मध्य प्रदेशातील छिंदवाडामधील सिहोरा गावात एका धार्मिक स्थळांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात जनतेस ते मार्गदर्शन करत होते. गोवंशासंबंधी चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले, सृष्टीचे पालन करण्यासाठी गाईची सर्वाधिक महत्ता आहे. जगात भारतीय गाय सर्वश्रेष्ठ मानली जाते. परंतु तिला कसायाकडे नेण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. गोवंशाचे संरक्षण कसे करता येईल? यावर विचार आणि प्रयत्न झाले पाहिजेत, असे भागवत म्हणाले.