Breaking News

चोभेवाडी शाळेने 5 लाख बिया केल्या प्रयोगवनकडे सुपुर्द

बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पूर्ववत आणण्याबरोबरच स्वत:चा ऑक्सिजन स्वत:च तयार करण्याची भेदक वास्तवता भावी पिढीला समजावी, त्यातुनच भावी पिढीने पर्यावरण संवर्धनाकरिता गंभीरपणे कृतीशील पावलं उचलावीत यासाठी प्रयोगवन परिवार गेल्या काही वर्षांपासुन जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सहभागातून बियासंकलनाची मोहीम राबवत आहे. त्यानुसार जामखेड तालुक्यातील चोभेवाडी प्राथमिक शाळेने जमवलेल्या 5 लाख बिया प्रयोगवनकडे नुकत्याच सुपुर्द केल्या. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार कृषी व पर्यावरण या विषयांवर राज्यभरात काम करत असलेल्या प्रयोगवन परिवार या सामाजिक संस्थेकडून बिघडलेल्या पर्यावरणाला पूर्ववत आणण्याकरिता काही पावलं उचलली जात आहेत. बेसुमार वृक्षतोड, प्रदूषण, रासायनिक खतांचा होणारा बेसुमार वापर, जलप्रदूषण याचा मोठा फटका जगभरात बसत आहे. यातून आसमानी संकट अधिक गडद होत आहेत. एकिकडे सातत्याने पडणारा दुष्काळ तर काही ठिकाणी हवामान बदलामुळे बेसुमार पडणारा पाऊस, पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ, हिमनद्या वेगाने वितळवत आहेत. दुसरीकडे पर्यावरणीय बदलामुळे भूकंपाच्या घटनाही वेगाने घडत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या संतुलनाच्या भेदक चटक्यांनी जगभरातील मानव होरपळून निघू लागला आहे. हे चित्र बदलवण्यासाठी प्रयोगवन परिवार या सामाजिक संस्थेकडून बियासंकलनाची मोहिम राबवली जाते. जमा झालेल्या बिया पावसाळ्यात उघड्या बोडक्या डोंगरावर फेकल्या जातात. यातून ज्या बिया मातीत गाडल्या जातात त्या उगवतात. ज्या जमिनीवर राहतात त्या बिया पक्षांसाठी अन्न म्हणून उपयोगी येतात. ही मोहीम शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाचे महत्व विशद करुन आपण घरात जी विविध प्रकारची फळे खातो, त्या फळांच्या बिया फेकून न देता त्या जमा करणे तसेच आपल्या अवतीभोवती असलेल्या जंगली झाडांच्या बिया जमवून त्याचे पावसाळ्यात रोपण केल्यास आपण निसर्गाचे संवर्धन करु शकतो. ही भावना रुजवण्याचे काम प्रयोगवन राज्यातील विविध शाळांमध्ये करत आहेत. यात अनेक शाळा सहभागी होत आहेत. मागील 2 वर्षांत दीड कोटी बियांचे संकलन करण्यात प्रयोगवनला यश आले होते. यंदाही यात मोठी वाढ होईल अशी खात्री प्रयोगवनचे अध्यक्ष सत्तार शेख यांनी व्यक्त केली.
प्रयोगवनने पर्यावरण रक्षणासाठी हाती घेतलेल्या बियासंकलन मोहिमेस जामखेड तालुक्यातील चोभेवाडी प्राथमिक शाळेने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुमारे 5 लाख बियांचे संकलन केले. नुकतेच विद्यार्थ्यांनी जमविलेल्या या बिया शाळेच्या वतीने प्रयोगवनचे अध्यक्ष सत्तार शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय महामुनी, हनुमंत काळे, तात्या कुमटकर, बाबासाहेब कुमटकर, बजरंग खोटे यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.