Breaking News

डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

औरंगाबाद : ज्येष्ठ लेखक, समीक्षक आणि विचारवंत गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी वयाच्या 81 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. एमआयटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु होते. साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गंगाधर पानतावणे यांना यंदाच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. राष्ट्रपती भवनात 20 मार्चला या पुरस्काराचे वितरण झाले होते. त्यानंतर अवघ्या सातच दिवसात पानतावणे यांची प्राणज्योत मालवली.

गंगाधर पानतावणे यांचे दलित साहित्य आणि दलित चळवळ या विषयांत भरीव योगदान असून महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांची विचारधारा साहित्याच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पानतावणे यांनी केले. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 रोजी नागपुरात झाला. 1956 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी बी ए आणि एमएची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तत्कालिन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडीही प्राप्त केली. त्याच विद्यापीठात म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्यांनी लिहिलेले ‘धम्मचर्चा’ ‘मूल्यवेध’ , मूकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, प्रकृती आणि प्रवृत्ती, शोध आणि सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. गंगाधर पानतावणे यांनी 2009 मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.