Breaking News

जीतन राम मांझी रालोआतून बाहेर राष्ट्रीय जनता दलात सहभागी होण्याचे संकेत

पाटणा : बिहारच्या राजकारणांत बुधवारी महत्वपूर्ण घडामोडी पहायला मिळायला असून, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी राष्ट्रीय लोकशाही आघाडी(रालोआ)तून बाहेर पडले आहेत. बिहारमधील विरोधी पक्षातील नेत्या राबडी देवी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर जीतन राम मांझी यांनी हा निर्णय जाहीर केला. बिहारमधील महायुतीत गुरुवारी सहभागी होणार असल्याचे जीतन राम मांझी यांनी सांगितले. मंगळवारी राजद नेते नेते भोला यादव यांनी जीतन राम मांझी यांना राजदमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.

बिहारमध्ये दोन विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेवर 11 मार्च रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र जागावाटपावरुन जीतन राम मांझी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. जीतन राम मांझी यांनी जहानाबादच्या जागेसाठी तिकीट मागितले होते. मात्र हे तिकीट त्यांच्या पक्षाला मिळाले नाही. दरम्यान एनडीएने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत जीतन राम मांझी यांच्या पक्षाला 20 जागा दिल्या होत्या. मात्र त्यांना केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. जीतन राम मांझी यांनी स्वतः दोन जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना एकाच जागेवर विजय मिळाला. जीतन राम मांझी यांनी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूतून वेगळे होत, हिंदुस्तानी आवाम मोर्चा या पक्षाची स्थापना केली होती. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून जीतन राम मांझी यांचा कार्यकाळ केवळ दहा महिन्यांचा होता.