Breaking News

बिबट्याने घेतला चिमुरडीच्या नरडीचा घोट!


संगमनेर/प्रतिनिधी। तालुक्यातील मालदाड येथील एका चार वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. अश्विनी सीताराम कडाळे {रा. मालदाड ता. संगमनेर} असे या दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. आईसोबत प्रातःर्विधीसाठी जात असतांना बिबट्याने तिच्यावर झडप घातली. गळ्याला गंभीर जखम झाल्याने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 

सीताराम कडाळे हे आपल्या कुटुंबासोबत मालदाड गावातील खळ्याच्या मळ्यात वास्तव्यास आहेत. ते वाट्याने शेती करतात. सोमवारी {दि. २६} पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मयत अश्विनीला उपचारार्थ घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात नेत असताना वाटेतच तिचे निधन झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेड कॉँस्टेबल लक्ष्मण औटी करत आहेत. वनविभागाने मालदाड गावात त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब नवले, माधव नवले, उत्तम नवले, विलास नवले, विपुल नवले, अजय नवले, राहुल नवले, रावबा शितोळे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.