Breaking News

खंडाळ्यात मकाळी आई मुक्ती संग्राम आंदोलनाचे आयोजन


पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करणारे हिरे व्यापारी नीरव मोदी याने कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे लाटलेल्या
अडीचशे एकर जमीन मूळ शेतकर्‍यांना परत मिळण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने काळी आई मुक्ती संग्राम आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार दि. 17 मार्च रोजी या लाटलेल्या जमीनीवर मूळ शेतकरी नांगर फिरवून आपला ताबा घोषित करणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

कर्जतचे माजी सभापती किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या आंदोलनात अ‍ॅड. कैलास शेवाळे, मिलिंद बागल, भाऊसाहेब वाघमोडे, माजी सरपंच रघुनाथ खरात, अ‍ॅड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, हराबाई ग्यानप्पा, विठ्ठल सुरम आदिंसह ग्रामस्थ इर्जिक पध्दतीने सहभागी होणार आहे. आंदोलनात सदर जमीनीवर ट्रॅक्टर व बैलांच्या सहाय्याने नांगर फिरवून मूळ शेतकरी आपला ताबा घोषित करणार आहे.
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सत्तेवर येण्यापुर्वी परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र सत्ता आल्यावर भारताबाहेरील काळा पैसा तर आला नाही. मात्र भारतात विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारख्यांनी दिवाळखोरी करुन देशा बाहेर पलायन गेले. अच्छे दिन सामान्य माणसाला आले नाही. तर अच्छे दिन अशा ठकविणार्‍या व्यापारी उद्योजकांचे आले. याला कारणीभूत ठरलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रतिकात्मक बांगडी अटक केली जाणार आहे.