Breaking News

शहरातील अडथळे ठरणार्‍या टपरीधारकांचे अतिक्रमण हटविले

शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना अडथळा ठरत असलेल्या जयहिंद चौक व जुन्या बस स्थानकासमोरील अशा जवळपास 30 ते 35 टपरीधारकांचे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग व एसटी आगार यांच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या मदतीने हटवण्यात आले. यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून लोकांनी रस्त्याच्या बाजूला माल ठेवून विक्री चालू केली आहे. अजूनही उर्वरित अतिक्रमण निघण्याची शक्यता आहे.

जामखेड शहरातून जाणार्‍या नगर - बीड या राष्ट्रीय महामार्गावरील जयहिंद चौक व जुन्या एसटी बस आगाराच्या परिसरात बांधकामे, स्टॉल्स, दुकाने अशा प्रकारचे अतिक्रमण करण्यात आले होते. पादचार्‍यांना, तसेच रस्त्यावर रहदारीस असुविधा होत होती. रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा मुद्दा वारंवार चर्चेत येत असल्याने नगर - बीड मार्गावरील एसटी बस आगाराने रस्त्यालगतच्या स्टॉल्स व दुकानधारकांना अनेक वेळा नोटिसा बजावून बेकायदेशीर बांधकाम व स्टॉल्स स्वतः हटविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. या सूचनांचे एसटी बस आगार परिसरातील बहुतांश स्टॉल्स धारकांनी पालन करून स्वतः स्टॉल्स हटविले होते. ग्रामीण भागातील बस एसटी बस आगारात थांबिविण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती, त्यानुसार आगार प्रमुख शिवाजी देवकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्र व्यवहार केला होता. तसेच जयहिंद चौकातील उर्दू शाळेसमोरील अतिक्रमण काढण्यात यावे. यासाठी उर्दू शाळेनेही सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवले होते. या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. ए. काझी यांनी दखल घेऊन दि. 14 मार्च रोजी सायं. 7 वाजण्याच्या सुमारास अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती. रात्री उशिरापर्यंत जुने बस स्थानक व जयहिंद चौकातील अतिक्रमण काढण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी, जेसीबी, ट्रॅक्टरचा या मोहिमेत सहभाग होता. या कारवाईमुळे शहरातील रस्ते, मार्ग मोकळे होऊ लागल्याने सर्वसामान्यांसह वाहनधारकांना दिलासा मिळू लागला आहे. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता.