Breaking News

सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करा-खा. अशोक चव्हाण

यवतमाळ  - राज्य व केंद्र सरकार जनविरोधी असून या सरकारच्या विरोधातील संघर्ष तीव्र करा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ते यवतमाळ येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबीराला मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी चव्हाण म्हणाले की, चुकीच्या शासकीय धोरणांमुळे शेतकरी मोठ्या संकटात आहेत. महागाईच्या तुलनेत शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही. राज्यात 13 हजारांपेक्षा जास्त शेतक -यांनी आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात अनेक शेतकर्‍यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली. जालन्यामध्ये एका शेतक-याने पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेले पीक स्वतःच्या हाताने नष्ठ केले. सरकार शेतक-यांचे प्रश्‍न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

काँग्रेसच्या महाअधिवेशनात शेतक-यांसाठी कृषी विषयक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कृषी धोरणात आमूलाग्र करून शेतक-यांचा मालाला योग्य हमीभाव. गरजू शेतक-यांना 2009 प्रमाणे कर्जमाफी, शेतक-यांच्या मुलांना उत्तम शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा आणि शेतकरी व शेतमजुरांसाठी पेन्शन योजना. उत्पादन खर्चावर आधारित हमीभावासाठी कायदा, शेतक-यांच्या फायद्याची नविन पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीवेळी शेतक-यांना मिळणा-या मदतीत वाढ अशा विविध कल्याणकारी योजना काँग्रेस सरकार आल्यावर सुरु केल्या जातील असा प्रस्ताव मंजूर केला आहे या प्रस्तावांची माहिती जनतेपर्यंत घेऊन जा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

यवतमाळ जिल्ह्यात शेतकर्‍यांनी शासकीय हमी केंद्रात विकलेल्या तुरीचे तब्बल 34 कोटींचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. यवतमाळ शहराला वीस दिवसांत एकदा पाणी मिळते. शेतकरी, कष्टकरी, दलित, महिला, आदिवासी, विद्यार्थी, तरूण यापैकी समाजातील एकही घटक सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही. जनतेच्या प्रश्‍नांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात संघर्ष करा. शेतक- यांच्या शेतमाला हमी भाव आणि तरूणांच्या हाताला काम फक्त काँग्रेस सरकारच देऊ शकते त्यामुळे देशात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी का ँग्रेस कार्यकर्त्यांना केले.