Breaking News

एसबीआयने 41 लाख खाती केली बंद


नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बँकेत एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 दरम्यान किमान मासिक ठेव न ठेवणारी 41.16 लाख खाती बंद केली आहेत, असे एका आरटीआय प्रश्‍नाद्वारे समोर आले आहे. किमान मासिक ठेव न ठेवल्यास ग्राहकांकडून दंड वसूल करण्याच्या नियमामुळे चालू आर्थिक वर्षातील 10 महिन्यांमध्ये (एप्रिल ते जानेवारी) एसबीआयने 41.16 लाख खाती बंद केली. मध्य प्रदेशातील नीमच येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी सांगितले, की त्यांनी केलेल्या आरटीआय याचिकेला एसबीआयच्या अधिकार्‍याने दिलेल्या उत्तरात ही माहिती प्राप्त झाली आहे. किमान ठेव न ठेवणार्‍यांवर दंड आकारण्याच्या नियमामुळे एसबीआयद्वारे आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान 31 जानेवारीपर्यंत 41.16 लाख खाती बंद करण्यात आली. देशातील या सर्वात मोठ्या बँकेने एप्रिल महिन्यापासून किमान बाकी न ठेवणार्‍यांसाठीची दंडाचे शुल्क 75 टक्क् यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गौड यांनी सांगितले, जर एसबीआयने दंडाचे शुल्क कमी करण्याचा निर्णय वेळेत घेतला असता तर 41.16 लाख खाती गमावण्याची वेळ बँकेवर आली नसती. यासोबतच मोठ्या संख्येने गरीब लोकांचा समावेश असणार्‍या खातेधारकांना त्रास झाला नसता. एसबीआयने मेट्रो व शहरी भागात किमान ठेव न ठेवणार्‍यांसाठी दंडाची रक्कम 50 रुपयांवरून 15 रूपये केली आहे. यासोबतच छोट्या शहरांमध्ये दंडाची रक्कम 40 रुपयांवरून 12 रूपये केली असून ग्रामीण भागासाठी 10 रुपये केली आहे. यामध्ये जीएसटी वेगळा लागेल.