Breaking News

नवीन जिल्ह्याचे संगमनेर मुख्यालय करा : अॅड. होडगर


आश्वी : प्रतिनिधी :- संगमनेर शहराची लोकसंख्या तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाची आहे. हे शहर नाशिक - पुणे महामार्गालगत वसलेले आहे. या शहराजवळून अमृतवाहिनी प्रवरानदी वाहत आहे. तर पुणे- संगमनेर- नाशिक असा रेल्वे मार्गाचा नवीन प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. संगमनेर शहर हे सर्वांसाठी महत्वाचे व मध्यवर्ती ठिकाण असल्याने संगमनेर जिल्ह्याचे मुख्यालय करा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर यांनी केली.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की काही दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे लवकरच नगर जिल्हा विभाजनाचा निर्णय होणार असल्याने संगमनेरच्या जनतेने संगमनेर हे नवीन जिल्हाचे मुख्यालय करण्यासाठी आपआपल्या स्तरावर उठाव करावा. दरम्यान, शासनाच्या नवीन धोरणानुसार नवीन प्रस्तावित कॅनॉल हे बंदिस्त पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन बंदिस्त कॅनॉल हे संगमनेर तालुक्यातील निमोण मार्गे घेण्यात यावा. कारण सध्या तळेगाव गटातील निमोन, नान्नज पारेगाव, सोनोशी, कर्हे, पारेगाव, चिंचोली गुरवचा काही भाग हा निळवंडे धरणापासून वंचित आहे. त्यामुळे तळेगाव गटाला निळवंडे धरणाच्या डाव्या कॅनॉलचा फारसा फायदा होत नाही. तर शिर्डीला बंदिस्त पिण्याची पाईपलाईन जाणार असल्याने त्यामध्ये तळेगाव गटाचाही समावेश सरकारने करावा.