Breaking News

योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्‍नचिन्ह,पंतप्रधान मोदी यांना भाजप खा. अनुप मिश्रा यांचा घरचा आहेर

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर बोट ठेवत, भाजप खासदार अनुप मिश्रा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान मोदींनी कितीही स्वप्नं पाहिली, तरीही त्यासाठीच्या योजनांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्याचा सर्वसामान्यांना काहीही फायदा होणार नाही, असे वक्तव्य मिश्रा यांनी केले आहे.


मिश्रा हे मध्यप्रदेशच्या मुरैनामधून लोकसभेचे खासदार आहेत. त्यांनी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या काळात हे वक्तव्य केले. यापूर्वी त्यांनी देशातील योजनांच्या मुल्यांकनासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, मोदी सरकारकडून इतक्या योजनांचा शुभारंभ झाला. पण यातील कोणत्याही योजनेवरील उत्तरदायित्त्व निश्‍चित केलेले नाही. त्यामुळे योजनांवर करडी नजर ठेवल्यास, त्याचा जनतेला निश्‍चित लाभ मिळेल. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघात राबवलेल्या योजनांवरही जाहीर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, त्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी कोण जबाबदार आहे. त्यासाठी उत्तरदायित्त्व कुणाचे? यावर उत्तर देताना योजना मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी सांगितले की, सरकारमधील विविध मंत्रालये संबंधित योजनांचे मुल्यांकन करतात. आणि त्यावरील उत्तरदायित्त्व निश्‍चित होते.