Breaking News

स्वबळाच्या लढाईतून माघार नाही : संजय राऊत

मुंबई : आम्ही स्वबळावर लढण्याचा बाण धनुष्यातून सोडला आहे, त्यामुळे आता माघार नाही, असे स्षष्ट मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावेळी राऊत यांनी भाजपला इशाराही दिला. 2019 ला भाजप संपलेला असेल असे सूचीत केले.2019 ला भाजपचा क्लायमॅक्स असेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेने केली. गुजरात निवडणूक हा ट्रेलर होता. राजस्थान पोटनिवडणूक मध्यांतर आहे. तर 2019 ला भाजपचा समाप्तीचा सिनेमा पाहा, असा थेट इशारा राऊत यांनी भाजपला दिला.


दिल्लीत काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीए घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला शिवसेनेकडून हजेरी लावण्यात आली होती. खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्र लढण्याच्या केलेल्या घोषणेचे काय, याची चर्चा होत होती. मात्र, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. धनुष्यातून बाण सुटला, तो आता मागे घेणे शक्य नाही, असे म्हणत सेना स्वतंत्र लढण्याचे पुन्हा एकदा संकेत दिले आहे. गुजरात निवडणुकीत ट्रेलर पाहिला आणि आता राजस्थान पोटनिवडणुकीत मध्यांतर पाहायला मिळाला. आता आम्ही 2019 मध्ये प्रदर्शित होणार्‍या सिनेमात भाजपचा क्लायमॅक्स पाहायला मिळेल, असे राऊत यांनी म्हटले. 2019 मध्ये एकट्याने लढण्यास आमच्या संकल्प केला. हा संकल्प मागे घेण्याचा प्रश्‍नच नाही. एकदा बाण धनुष्य सोडले की ते परत येत नाही, असे सांगत संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्यावर शिवसेना ठाम असल्याचे स्पष्ट केले.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018 चा अर्थसंकल्प सादर केला. तो केवळ कागदावरचा आहे. प्रत्यक्षात हाती काहीही नाही. देशात आणि राज्यात शेतकर्‍यांचा प्रश्‍न बिकट होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकर्‍याला संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे कागदी घोडे काय कामाचे, असे म्हणत राऊत यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.