Breaking News

राष्ट्रवादीचा निळवंडे प्रकल्पाच्या प्रलंबित कामांच्या मागणीसाठी धडक मोर्चा

निळवंडे धरणाची निर्मिती कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात झाली. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना निळवंडे धारणाच्या कालव्यांच्या सिंचनासाठी लाभ होत नाही. अकोलेतील निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइद्वारे करावीत, अन्यथा यापुढे कुठेही आंदोलन न करता अकोलेत मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केली. 


अकोले तालुक्यातील निळवंडे प्रकल्पाच्या प्रलंबित व इतर मागण्यांसाठी संगमनेरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या दरम्यान पत्रकारांशी बोलतांना माजी मंत्री पिचड यांनी सरकारवर टिका केली. मोर्चात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, मिनानाथ पांडे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती कैलास वाकचौरे, सुरेश गडाख, अशोक देशमुख, गोरख मालूंजकर, गिरजाजी जाधव, शंभूराजे नेहे, भाऊसाहेब वाळुंज, विकास शेटे आदि उपस्थित होते.

माजी मंत्री पिचड म्हणाले, सरकार शेतकरीविरोधी आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी युती सरकारने आर्थिक तरतूद केली नाही. अकोले तालुक्यातील निंब्रळ, म्हाळादेवी, रूंभोडी, इंदोरी, मेहेंदूरी, औरंगपूर आदि गावांतील बागायती क्षेत्र वाचविण्यासाठी मुख्य कालवे बंदिस्त पाईपलाईनद्वारे करावेत. कोकणात वाहून जाणारे पाणी भंडारदरा धरणात वळवावे. बिताका प्रकल्पासाठी निधी मिळावा. आंबड, धामणगाव आवारी, धुमाळवाडी, नवलेवाडी, वाशेरे, परखतपूर, पानसरवाडी, मनोहरपूर या पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळावे अशी मागणी त्यांनी केली. मागण्याचे निवेदन प्रातांधिकारी भागवत डोईफोडे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता संगिता जगताप यांनी स्वीकारले.