Breaking News

कंत्राटी कर्मचार्‍यांचा काम बंदचा इशारा


श्रीगोंदा / प्रतिनिधी । 23 - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित करणार नसल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाच्या निषेधार्थ कंत्राटी कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. सोमवार पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कंत्राटी कर्मचार्‍यांंनी गटविकास अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 16 फेब्रु. 2018 रोजी राज्य शासनाने सध्या राज्यात जे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, अशा कर्मचार्‍यांना शासन सेवेत नियमित करता येणार नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांवर अन्याय होणार आहे. अशी भावना कर्मचारी वर्गात निर्माण झाली आहे.राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी सामूहिक काम बंद करणार आहेत. त्यानुसार श्रीगोंदा पंचायत समितीतील कंत्राटी कर्मचार्‍यांनी गटविकास अधिकारी राणी फराटे यांना निवेदन देऊन शासनाच्या निर्णयाचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. येत्या सोमवारपासून श्रीगोंदा पंचायत समितीतील सर्व कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. यावेळी स्वच्छ भारत अभियान कक्षाचे राहूल साळवे, सागर कुर्‍हे, मंगल मोरे, नरेगाचे अमोल निंभोरे, मुन्ना शेख, गणेश भोसले, आरोग्य विभागाचे राहुल महामुनींसह आदी उपस्थित होते.