Breaking News

ग्रामीण महाराष्ट्राची वाटचाल स्वच्छतेकडे...तीन वर्षात ५० लाख शौचालयांची उभारणी


नवी दिल्ली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशात गेल्या तीन वर्षात 5 कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात 50 लाख 8 हजार 601 शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे, तर राज्यातील 16 जिल्हे व 34 हजार गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
देशात तीन लाख गावे हागणदारीमुक्त
2 ऑक्टोबर 2014 रोजी देशातल्या ग्रामीण भागात 38.70 टक्के घरगुती शौचालये होती, 14 जानेवारी 2018 अखेर ही टक्केवारी 76.26 टक्क्यांवर पोहोचली आहे. आजअखेर देशात 5 कोटी 94 लाख 45 हजार शौचालयांची निर्मिती झाली आहे, तर देशातील 3 लाख 9 हजार 161 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. देशातील 303 जिल्हे हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 34 हजार गावे हागणदारीमुक्त....
2015-16 या वर्षात 6053 गावे राज्यात हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आली होती. ही संख्या 2016-17 मध्ये 21 हजार 702 इतकी झाली. आज अखेर महाराष्ट्रातील 34 हजार 157 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. राज्यातील गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, जालना, बीड,अहमदनगर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर व रायगड ही जिल्हे हागणदारीमुक्त झाली आहेत.