Breaking News

चित्रपटांमध्ये आजच्या काळात समाज परिवर्तन घडविण्याची एक ताकद -सुमित्रा भावे

पुणे, दि. 27, जानेवारी - आपल्या चित्रपटसृष्टीत चित्रपटांच्या कथानकामुळे अनेक बदल होत असतात. रसिक घडत असतात तर मनुष्याच्या बुध्दीची प्रगल्भताही बदलत असते. यासारखे अनेक बारीक-सारीख बदल झाल्याचे दिसते. त्यामुळे चित्रपटांमध्ये आजच्या काळात समाज परिवर्तन घडविण्याची एक ताकद आहे,असे मत ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.


आशय फिल्म क्लबच्या वतीने 8 व्या एशियन चित्रपट महोत्सवाचे आयोज करण्यात आले आहे. हा महोत्सव 30 जानेवारी पर्यंत रंगणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शिका भावे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना झेनितएशिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी शालेय तथा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचे सांस्कृतिक सल्लागार मिलींद लेले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, सतीश जकातदार, आशय क्लबचे वीरेंद्र चित्राव, एफटीआयआयचे भुपेंद्र कँथोल व अन्य उपस्थित होते. 


भावे म्हणाल्या, मला सिनेमे बनवायला आवडतात. मी पहिल्यांदा सत्यजित रे यांचा सिनेमा पाहिला, मला तो खुपच आवडला होता. त्यांनी बनविलेल्या ख-या माणसांच्या चित्रपटांचा बारकाईने अभ्यास करत मी चित्रपट बनवायला शिकले.यावेळी कासारवल्ली म्हणाले, माझा पुण्याशी खूपच जुना ऋणाणूबंध आहे. 1975 साली मी एफटीआयआयमधून बाहेर पडलो. पुण्यात माझे अनेक सवंगडी आहेत. त्यानंतर मी माझा पहिला चित्रपट 1977 साली प्रदर्शित केला तो म्हणजे गटश्राध्द, त्यानंतर अनेक चित्रपट मी बनविले.