Breaking News

सक्तीच्या वीज वसुलीमुळे शेतकर्‍याची आत्महत्या : अजित पावर


लातूर : महावितरणकडून आता सक्तीने वीजबिल वसूल केले जात असल्यामुळे लातूरमध्ये शेतकरी आत्महत्या करु लागले आहेत अशी टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये ही पत्रकार परिषद झाली. यावेळी शहाजी राठोड या शेतकर्‍याच्या तब्बेतीची रुग्णालयात जावून विचारपूस केल्यानंतर अजित पवार यांनी ही पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टिका केली. कर्जमाफी नाही, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍याला मदत नाही अशा सगळया गोष्टीने शेतकरी हैराण झाला असतानाच आता वीजबिलाच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे.
लातूर जिल्हयातील औसा तालुक्यातील उजनी गावातल्या शहाजी राठोड या शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला त्या शेतकर्‍याची विचारपूस केली. शेतकरी आत्ता सरकारच्या चुकीच्या धोरणाचे बळी ठरत आहेत असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. त्रासून गेल्यानंतर, कंटाळून गेल्यावर, पैसा येणं बंद झाल्यावर माणूस मेटाकुटीला येतो. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. राठोड यांच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री निधीतून मदत मागण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आत्महत्या असल्याने अशी मदत करता येत नाही, असे शेतकर्‍याच्या नातेवाईकांना सागंण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आत्महत्येचे समर्थन करत नाही. आत्महत्या करणे चुकीचे आहे. परंतु अशा दुर्देवी घटना घडल्यावर मदतीची भूमिका ठेवली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.मागील दोन- तीन वर्ष दुष्काळ होता. त्यामुळे याकाळातील बिल पाठवणे योग्य नाही. परंतु महावितरणच्या अधिकार्‍यांनी मागच्या काळातील बिल पाठवून दिले आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.