Breaking News

ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही : तनपुरे


राहुरी प्रतिनिधी :- साखर कारखानदारांपुढे सध्या साखरेच्या दराचे संकट उभे ठाकले आहे. साखरदराची कोंडी फोडण्यासाठी शासनाने त्वरित पाऊले उचलून घसरत्या साखरदरासाठी ठोस निर्णय घ्यावा. ३५ रूपये दर असलेली साखर सध्या ३० रुपये किलोच्या खाली आली आहे. कारखानदारांना ऊस गाळप झाल्यानंतर ऊस उत्पादक सभासदांना जास्तीचे दाम देण्यासाठी उपाययोजना करताना दमछाक होणार आहे. प्रसाद शुगर तालुक्यातील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष तथा प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती पत्रकार संजय कुलकर्णी, उपनगराध्यक्षा सुमती सातभाई, संगीता आहेर, अनिल कासार, दिलीप चौधरी, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, विलास तनपुरे, विजय करपे, गजानन सातभाई आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष तनपुरे म्हणाले, घसरणीला येत असलेले साखरदर आणि तालुक्याच्या क्षेत्रात उभ्या असलेल्या ऊसाच्या गाळपाचे नियोजन यादृष्टीने प्रसाद शुगर सर्व सभासदांनी काळजी करु नये. सर्वांचा ऊस गाळप करणारच आहे. कार्यक्षेत्रातील शेवटचे टिपरु गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही. एप्रिल मे पर्यंत कारखाना सुरुच ठेवणार आहे. आम्ही ऊस उत्पादकांना २ हजार ६०० रुपये दर जाहीर करणार होतो आणि शेवटचे पेमेंट हे २ हजार ८५० पर्यंत देणार होतो. मात्र शासनाच्या आडमुठे धोरणामुळे निर्णय बदलावा लागला. साखरचे दर व बफरस्टॉक तसेच निर्यातधोरण याबाबत शासन उदासिन आहे. 

यावेळी वसंत झावरे, सय्यद निसार, राजेंद्र वाडेकर, भाऊसाहेब येवले, प्रभाकर मकासरे, विलास गिर्हे, गणेश हापसे, विनीत धसाळ, रियाज देशमुख, सुनील भुजाडी, संदीप रासकर, विलास कुलकर्णी आदींची भाषणे झाली. यावेळी नगराध्यक्ष तनपुरे यांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या २०१८ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी सनिल फड़के यांनी प्रास्तविक केले. अप्पासाहेब तनपुरे यांनी सूत्रसंचलन केले.