Breaking News

उक्कलगावच्या ग्रामसभेला अभूतपूर्व प्रतिसाद ग्रामस्थांना मिळाली बोलण्याची संधी


श्रीरामपूर / प्रतिनिधी :- प्रथम लोकनियुक्त सरपंच नितीन थोरात व नूतन सदस्यांनी पदभार स्विकारल्यानंतर परवा {दि. २६ } प्रथमच झालेली ग्रामसभा विविध प्रश्नांवर गाजली. सभेत यापूर्वी कधीही माईकशी संबंध न आलेल्या सर्वसामान्य ग्रामस्थांच्या हातात माईक आल्याने मूलभूत प्रश्नांवर बोलण्याची त्यांना संधी मिळाली. या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 

प्रजासत्ताकदिनी नूतन सरपंच नितीन थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास ग्रामसभा सुरु झाली. सभा सव्वादोन तास चालली. यावेळी सरपंच नितीन थोरात, उपसरपंच शारदा जगधने, ग्रामसेवक निबे, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या इतिहासात कधी नव्हे इतकी गर्दी या ग्रामसभेला झाली. ग्रामस्थांनी निःसंकोचपणे मनातील खदखद व्यक्त केली. नूतन पदाधिकाऱ्यांनी तितक्याच पोटतिकडीने नागरिकांचे प्रश्न समजावून घेतले. ग्रामविकास अधिकारी निबे यांना नागरिकांच्या कारवाईचे आदेश देण्यात आले. 

सुनील थोरात, आबासाहेब थोरात यांनीही प्रलंबित अनेक प्रश्नांना वाचा फोडत त्याबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. पटेलवाडी परिसरात स्वतंत्र नवीन रेशन दुकान द्यावे, अशी मागणी करण्यात आली.