Breaking News

लालू यादव यांना 5 वर्ष कारावासाची शिक्षा चारा घोटाळयाच्या तिसर्‍या खटल्यात दोषी

रांची/वृत्तसंस्था : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्यातल्या तिसर्‍या खटल्यातही दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा बुधवारी सुनावण्यात आली. या तिसर्‍या खटल्यात लालू प्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 56 पैकी 50 आरोपींना पाच वर्षे सक्त मजुरी आणि 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर 6 आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. चाईबासा चारा घोटाळ्यात ही शिक्षा सुनावण्यात आली.


दरम्यान, लालू प्रसाद यादव यांना गेल्याच महिन्यात चारा घोटाळ्याच्या दुसर्‍या खटल्यात साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असल्याने ते सध्या बिरसा मुंडा तुरूगांत शिक्षा भोगत आहेत. सलग तिसर्‍या चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यांना शिक्षा सुनावली गेल्याने ते पुढची किमान 16 वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरणार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यामुळेच लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्यात अडकवले जात असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाने यापूर्वीच केला. पूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन 1991 ते 1997 या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने 89.27 लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाजयाचा पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहित असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता. या घोटाळ्याच्या एकूण 33 खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या 37.5 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व 25 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती. सन 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना 11 वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी सहा वर्षांनी वाढेल.