Breaking News

डॉ पंजाबराव देशमुख यांचे विचार तळागाळातील जनमानसात पोहचवू

अमरावती/प्रतिनिधी :- ओबीसी सेवा संघ हे कर्मचारी अधिकारी शेतकरी विद्यार्थी व ईतर बुध्दीजीवी वर्गाचे सामाजिक विचारपीठ आहे. कष्टकरी शेतकरी व ओबीसी समाजासाठी आपल्या जीवाचे रान करणार्‍या भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख यांचे विचार आम्ही तळागाळातील जनमानसात पोहचवू, असे प्रतिपादन प्रदीप ढोबळे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांनी केले. ते पापळ (वाढोणा) येथे, ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र आयोजित 8 वे राज्य अधिवेशनात बोलत होते.


पापळ वाढोणा हे गाव अमरावती जिल्ह्यात असुन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव आहे. भाऊसाहेबाचे विचार, कष्टकरी, शेतकरी जनतेसाठी असलेली तळमळ, त्याचे विचार जगाला माहित करण्यासाठी ओबीसी सेवा संघाने राज्य अधिवेशन पापळ या भाऊसाहेबाच्या जन्मगावात घेतले. मा. नागेश चौधरी नागपूर यांच्या कार्याचा गौरव, कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बळीसंदर्भ पाक्षिकाचे प्रकाशन करण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन मा.माधवी खोडे (आयएएस), अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांनी केले व ओबीसी मुलांनी स्पर्धा परिक्षेकडे पाहावे असे आव्हान केले. 

या प्रसंगी मा.स्वप्निल वानखडे (आयएएस) यांचा सत्कार करण्यात आला व प्रेरणात्मक संदेश दिला. तसेच मा. निशा शेंडे अमरावती यांनी मार्गदर्शन केले. सकाळी 10 वाजता गावातुन संविधानाचा व भाऊसाहेबाच्या विचाराचा जयजयकार करीत ‘संविधान दिंडी’ काढण्यात आली. यावेळी खुशाल ठाकरे ग्रामगीताचार्य, गजानन अमदाबादकर शेतकरी नेते, विजय अजबले सरपंच पापळ, डॉ राजेश पांडे,धानोरा गुरव रत्नाताई सोनवणे धुळे हे भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख विचारपिठावर उपस्थित होते. या अधिवेशनाला  महाराष्ट्र राज्यातुन मोठ्या संख्येने प्रतीनीधी उपस्थित  होते. या कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र गद्रे महासचिव प्रास्तविक दिगंबर दळवी मुंबई  व आभार रमेश धुळे जिल्हाध्यक्ष अकोला यांनी केले.

आधिवेशनातील ठराव 
ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी
ओबीसीचा घटनाविरोधी क्रिमीलेअर रद्द करण्यात यावा
ओबीसी शेतकरी यांना शेतीसाठी मोफत साहित्य पुरवावेत
विद्यार्थ्यांसाठी 100% स्कालरशीप देण्यात यावी