Breaking News

ओखी वादळाच्या प्रश्‍नावरुन विधीमंडळात खडाजंगी.

नागपूर : कोकणसह उत्तर आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पिकांचे आणि शेतीचे ओखी वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामेही सरकारने केलेले नाहीत. शेतकर्‍यांच्याबाबतीत इतके असंवेदनशील सरकार वागले असून आता या शेतकर्‍यांना सरसकट मदत दयावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी आज, बुधवारी विधानपरिषदेत केली.

यासंदर्भात तटकरे म्हणाले की, राज्यातील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्डयांसाठी महाराष्ट्रभर फिरणार्‍या संवेदनशील महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकणाला खड्डयात घालण्याचे काम करु नये ते पाप घेवू नका असा सल्ला सुनिल तटकरे यांनी दिला. ओखी वादळामुळे झालेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर तटकरे यांनी सरकारला धारेवर धरले. निसर्गातील बदलामुळे कोकणातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानाकडे सरकारने लक्ष दिले नाही. झालेल्या नुकसानाचे पंचनामेही नाहीत. सरकारच्या या असंवेदनशीलतेबाबत आपण सभागृहामध्ये चर्चेच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करत आहोत. सरकारला ओखी वादळ येणार याचा अंदाज मिळाला होता परंतु हे सरकार ओखी वादळ येईपर्यंत ढिम्मपणे पहात राहिले. मच्छीमारांच्या बोटींना फक्त लाल बावटे दाखवण्यापलीकडे सरकारने काही केले नाही असा आरोप तटकरे यांनी केला.

ओखी वादळ येणार हे माहित असूनही कोकणातील महसुल यंत्रणा आणि त्याची व्यवस्था पाहणारे जिल्हाधिकारी काय करत होते असा सवाल तटकरे यांनी करत सरकारचे वाभाडे काढले. ओखी वादळ आलेच शिवाय कोकणसह उत्तर आणि पश्‍चिम महाराष्ट्रामध्येही पावसानेही हजेरी लावली होती. त्यामुळे आंबा, काजू, सुपारी, नारळ, द्राक्षबागा, स्ट्रॉबेरी पीक आणि मच्छीमारांचेही मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. एवढे मोठे आस्मानी-सुलतानी संकट शेतकर्‍यांवर आले असतानाही सरकारची संवेदनशीलता कुठे गेली होती. आम्ही सभागृहामध्ये लक्षवेधी केल्यानंतर शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे घालण्यास सुरुवात करण्यात आली. तेच नुकसान झाल्यावर पंचनामे का करण्यात आले नाहीत. मी अधिकार्‍यांना पंचनामे घालण्याबाबत फोन केले त्यावेळी पंचनामे घालण्यासाठी सरकारकडून आदेश नसल्याचे अधिकारी सांगत होते. सरकारची कोकणाबाबतची संवेदनशीलता का मेली आहे असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.ओखी वादळाचा फटका बसलेल्या तामिळनाडूला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली. पंतप्रधानांनी कोकणात यावे असे आपण म्हणणार नाही. परंतु, राज्याचे पालक असलेल्या मुख्यमंत्र्यांनी किंवा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकणाला भेट दयायला हवी होती असे तटकरे म्हणाले.