Breaking News

पांढऱ्या सोन्यावर कोसळले आस्मानी सुलतानी संकट


श्रीगोंदा/ प्रतिनिधी/- श्रीगोंदा तालुक्यात खरिपाच्या पहिल्या टप्प्यात पावसाने दिलेली उघडीप, त्यानंतर ऐन वेचणीच्या वेळी परतीच्या पावसाने दिलेला दणका यामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. बोंडअळीने तब्बल दोन हजार नऊशे हेक्टरवरील कपाशी पोखरली आहे. कपाशीवरील ही नैसर्गिक संकटे आणि मिळणारा अल्प दर यामुळे शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कपाशीवर यंदा सुरुवातीपासूनच वेगवेगळी नैसर्गिक संकटे आली. पावसाळा संपल्यावर शेतकर्यांनी तब्बल दोन हजार नऊशे हेक्टर वर कपाशी लागवड केली. सुरवातीला ती अतिशय जोमाने उगवालीही, मात्र हिवाळ्यात थंडीमुळे बागायती कपाशीला नवीन पाने व बोंड लागण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेतकरी रात्रं-दिवस जागून कपाशीला पाणी देण्यासाठी व आपले पिक कसे जोमात येईल. यासाठी मोठ्या प्रमाणात धडपडत आहेत. मात्र, बोंडअळीमुळे कपाशीची बोंडे किडत असून, खाली पडत आहेत.तालुक्यातील १ हजार नऊशे हेक्टर कपाशीचे बोंडअळीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 

सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणारा कृषी विभाग या प्रकारामुळे मात्र आता खडबडून जागा झाला आहे. महाराष्ट्र कापूस बी-बियाणे अधिनियम २००९ नुसार संबंधित बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासह बाधित शेतक-यांना बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शेतक-यांनी फॉर्म जी फॉरमॅटमध्ये अर्ज भरून संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी विकास अधिकारी, कृषी सहायकाकडे जमा करावेत, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.त्यानुसार आता तालुक्यात कपाशी पिकाचे पंचनामे चालू झाले आहेत मात्र प्रक्रिया फार गुंतागुंतीच्या आहेत असेही बोलले जात आहे. 

गुंतागुंतीची प्रक्रिया-
फॉर्म जीसोबत बियाणे खरेदीची पावती किंवा बियाणे पिशवीची झेरॉक्स सोबत जोडावी. पावती नसल्यास कोणत्या दुकानातून खरेदी केले त्याचा उल्लेख अर्जामध्ये करावा, अशा सूचना आहेत. शेतक-यांकडून फॉर्म जी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व तालुका समितीमार्फत बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी अहवाल कृषी आयुक्तालयास पाठविण्यात येईल. कृषी आयुक्तालय संबंधित बियाणे कंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देईल. एक तर कंपनीला भरपाई द्यावी लागेल किंवा त्यांनी उच्च न्यायालयात अपील केल्यास शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार न्यायालयात बाजू मांडेल, अशी ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.