Breaking News

बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा


चंद्रपूर : शाळेच्या दुपारच्या सुटीत चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तब्बल २६ हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी दुपारी लालपेठ येथील एका शाळेत घडली.लालपेठ कॉलरी क्रमांक दोन येथे सूरज हिंदी स्कूल नामक शाळा आहे. या शाळेला दुपारची सुटी झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या जवळपास असलेल्या झाडाच्या बिया तोडल्या. 

बदामाच्या बिया समजून विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने काही वेळानंतर विद्यार्थ्यांना मळमळ वाटू लागले. याचदरम्यान २६ विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास जाणवू लागला. काही वेळातच प्रकृती अत्यवस्थ झाली आणि शाळा व्यवस्थापनामध्ये एकच धावपळ उडाली. विषबाधा झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना संध्याकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.