Breaking News

संपादकीय - विरोधकांना राजकीय बळ देणारा निकाल...

गुजरात निवडणूकांचे निकाल हाती आल्यानंतर केवळ भाजपचा हा विजय असून, काँग्रेसने उभारी घेतली इतपर्यंत या निकालाचे भवितव्य अवलंबून नसून, या निकालामुळे विविध राज्यात विरोधकांना बळ देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात देखील भाजपच्या गोटात धाकधुकी वाढली आहे, तर विरोधक पुढील निवडणूकांच्या बांधणीसाठी सरसावल्याचे चित्र दिसून येत आहे. एकेकाळी काँग्रेस सोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादीचे नेते नकार देत होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते देखील आपला अहं जोपासत आघाडीस नकारात्म होते. 


मात्र गुजरातच्या निकलानंतर सत्तापालट करू शकतो, याची विरोधकांना जाणीव झाल्या मुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ने आघाडीसाठी आत्तापासूनच पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.  आताच जर आघाडी झाली, तर विविध मतदारसंघात बांधणी करण्यासाठी संबधित उमेदवाराला वेळ मिळेल अशी धारणा काँगे्रस-राष्ट्रवादीच्या गोटात आहे. तर दुसरीकडे गुजरात निकालांमुळे भाजप धास्तावला आहे. कारण गुजरातमध्ये सत्ता स्थापन करण्यात भाजप जरी यशस्वी झाली असली, तरी मतांच्या टक्केंवारीचा आलेख हा घसरत चालला आहे थोडक्यात जनता भाजपपासून दूरावत चालली आहे. 

त्यामुळे भाजपच्या आमदारांची, मंत्र्यांची आपल्या मतदारसंघातील कामे म्हणावी इतकी प्रभावी नाही. त्यामुळे निवडणूकांना कसे सामोरे जायचे, असा प्रश्‍न सत्ताधारी भाजप पक्षाला पडला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदार, मंत्र्यांना विकासकामे करण्यावर जोर देण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच मतदारसंघात जनसंपर्क कसा वाढवता येईल यावरही भर दिला आहे. मात्र काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसची पावले आघाडीच्या दिशेने पडत असली, तरी काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँगे्रसचे शरद पवार यांच्यातील राजकीय मतभेद संपून, आघाडी होईल का? हा देखील एक प्रश्‍न आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये एका पिढीचे अंतर आहे. तसेच राहुल गांधी आपल्या प्रचारदौर्‍यात स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेत नाही, अशी टीका खुद्द पवार यांनी केली होती. 

अशावेळी आघाडीसाठी कोण पुढाकार घेते, हे काही दिवसांनी स्पष्ट होईलच. एकीकडे काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रसने आघाडीसाठी पावले टाकण्यास सुरूवात केली असली, तरी भाजप-शिवसेना यांच्यातील कटुत्वाचे संबध, आणि सातत्याने एकमेकांवर होणार्‍या टीका हा भाजप व शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे. एकीकडे सत्तेत राहायचे आणि भाजपवर टीका करायचा हा खेळ शिवसेनेला महागात पडून, त्याची किंमत निवडणूकीत सेनेला मोजावी लागू शकते. त्यामुळे वेळीस सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका सेनेने आत्ताच घेतली तर एकवेळ सेनेला फायदा होऊ शकतो. मात्र सत्तेत पाच वर्ष राहायचे, भाजपवर टीकेची झोड उठवायची, आणि पुन्हा जनतेसमोर मते मागायची, ही रणनिती सेनेवरच उलटणार असल्याचे संकेत आताच्या राजकीय वातावरणांवरून दिसून येत आहे. 

गुजरात निवडणूकीत जर भाजपने 150 चा टप्पा गाठला असता, तर कदाचित केंद्रात देखील भाजप लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणूका घेण्यास अनुकूल दिसले असते. मोदी लाटेची पीछेहाट होण्यास सुरूवात झाली असून, अच्छे दिन कुठे अहे, असा सवाल सर्वसामान्य जनता करत आहे. काळे धन कुठे आहे, असे अनेक प्रश्‍न उपस्थित करत, सर्वसामान्य माणून आपली व्यथा मांडताना दिसून येत आहे. यासर्व कारणांमुळे भाजपची मतांची टक्केवारीचा आलेख घसरत चालला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात शांतता पसरली असून, 2019 च्या लोकसभा निवडणूकांना सामोरे जाण्यापूर्वी रणनितीत बदल करून, भाजपचा जनाधार वाढविण्याची मोठी जवाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असेल. तर दुसरीकडे समविचारी पक्षांची मोट बांधून 2019 च्या निवडणूकांना सामोरे जाण्याचे आव्हान राहुल गांधीसमोर असणार आहे.