Breaking News

सरकारकडून शेतकर्‍यांची फसवणूक हल्लाबोल मोर्चातून भाजप सरकारवर टीकेची झोड


नागपूर : साडेतीन वर्ष झाली, कर्जमाफीचा पत्ता नाही, असे म्हणत सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली. सरकार जर जनतेच्या उपयोगी येत नसेल, तर कर्जमाफी मिळेपर्यंत सरकारचे कोणतेही देणे आम्ही देणार नाही, कोणतीही वीज बील देणार नाही, असा निश्‍चय करा, हा मोर्चा इथेच थांबवू नका, आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरुच ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी हल्लाबोल मोर्चाच्या मंचावरुन केले.

राज्यातल्या भाजप व शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांच्या वतीने मंगळवारी हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मोर्च्याचे नेतृत्व केले. या मोर्चातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. 
या सरकारवर हल्लाबोल करून त्यांना जागे करावे लागेल. प्रचारसाठी पाकिस्तानच्या नावाचा गैरवापर भाजप सरकार करत आहे. आज देशात वेगळे चित्र बघायला मिळते आहे. आज देशात शेतकरी, तरुणांचे प्रश्‍न आहेत, मात्र देश दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न आहे. डॉ.मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगात कुणी शंका घऊ शकत नाही. पण त्याच्यावर आरोप केले गेले पाकिस्तानशी संगनमत केल्याचा आरोप करताना लाज वाटली पाहिजे. देशाची परंपरा धुळीस मिळवण्याचे काम सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. 

झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल मोर्चा आयोजित केल्याचे पवारांनी सांगितले. मनमोहन सिंह हे चारित्र्यवान नेते आहेत. पाकिस्तानच्या मदतीने गुजरात निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला. निवडणुका जिंकण्यासाठी असे आरोप करणे चुकीचे आहे. पाकिस्तानसोबत कारस्थान करत असल्याचा आरोप करताना सरकारला शरम वाटली पाहिजे, असा घणाघात शरद पवारांनी केला. कर्जमाफी देणार आहोत असे म्हणता, पण कधी देणार? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला.

लोकांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करायचे आणि लोकांचा संताप टाळण्यासाठी पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करायचा, साडेतीन वर्षापूर्वी शेतकर्यांची कर्जमाफी करू असे सांगितले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. आम्ही 2007 साली 15 दिवसात कर्जमाफी केली. गेली सहा महिने देवेंद्र फडणवीस सांगतायत आम्ही कर्जमाफी देणार आहोत. पण कधी देणार? आता सरकारचे कोणतेही देणे देणार नाही, वीजेचे बिल देणार नाही असा निर्धार आपण केला पाहिजे. 

शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि हे सरकार सक्तीची वसुली करत आहे. या सरकारने आमच्या शेतमालाला भाव दिला नाही, शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे तुम्ही निर्धार करा. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आम्ही काय केले. मनमोहन सिंग याच्या काळात आणि मी कृषी मंत्री असताना या देशात सगळ्यात जास्त अन्नधान्य उत्पादन झाले, त्याची दखल जागतिक संस्थानी घेतली. मुख्यमंत्री दमदाटी करून सामान्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न करत आहेत. ही जनता तुमची सत्ता उलथवून टाकेल, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला. 

2019 मध्ये सत्तांतर नक्कीच : पटेल 
पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकत्र पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारची झोप उडाली असणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली एकी कायम ठेवावी, 2019मध्ये सत्तांतर नक्कीच होई, असा विश्‍वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. युपीएच्या कालखंडापेक्षा 40 टक्के कमी भाव शेतमालाला आज मिळत आहे. विदर्भातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. कापसाचे बोंड आळीमुळे नुकसान झाले आहे, मात्र सरकार काहीच करत नाही. विदर्भात राज्याचे महत्त्वाचे मंत्रीपद असूनही इथे एकही नवीन योजना नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशात ज्या गुजरात मॉडेलचा प्रचार केला त्या गुजरातमध्येही भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या देशात परिवर्तनाचे वारे वाहायला लागले आहे. गुजरातमध्ये सत्तांतर झाले तर त्यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नल्याचे मत पटेल यांनी यावेळी नोंदविले. 

खोटी आश्‍वासने देणार्‍यांना माफी नाही :  आझाद
जे या देशातील लोकांना खोटी आश्‍वासने देतात त्यांना जनता माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये आश्‍वासन दिले होते की, शेतीसाठी जो खर्च केला जाईल तो खर्च शेतकर्‍यांना दिला जाईल आणि त्यावर आणखी फायदा दिला जाईल. पण आज मोदींच्या सरकारला साडे तीन वर्ष झाले. कुठे गेली त्यांनी केलेली आश्‍वासने? शेतकर्‍यांसोबत खोटे बोलणे हा देशाचा अपमान आहे. त्यासाठी त्यांना कधीही माफ केले जाऊ शकत नाही, अशी टीका राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांनी यावेळी केली.