Breaking News

सातारा जिल्हा परिषद शेतक-यांना देणार सुरक्षा किट !

सातारा, दि. 22, नोव्हेंबर - राज्यात पिकांवर औषध फवारणी करताना शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा परिषद आता जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी सरसावली असून, पाच हजार शेतकर्‍यांना औषध फवारणीवेळी वापरण्यासाठी सुरक्षा किट देणार आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


गेल्या महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात व इतर ठिकाणी पिकांवर औषध फवारणी करताना अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. सर्व बाजूंनी राज्य शासनावर टीका करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांच्या दृष्टीने काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या. शासनाकडून मदतीचे आश्‍वासन देण्यात आले. 

अशा या घटनेनंतर सातारा जिल्हा परिषदही शेतकर्‍यांच्या सुरक्षेसाठी पुढे आली आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील पाच हजार शेतकर्‍यांना औषध फवारणीवेळी वापरण्यासाठी सुरक्षा किट वाटपाचा निर्णय घेतला. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. कृषी समिती सभापती मनोज पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शेतकर्‍यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले.
जिल्ह्यात एकूण 934 दुकाने ही कीटकनाशक विक्रीची आहेत. या दुकानात सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. तशा विक्रीच्या सूचनाही दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. या किटची किंमत 150 रुपये आहे. त्यापैकी 50 रुपये हे शेतक-यांनी भरायचे असून, 100 रुपये अनुदान मिळणार आहे. 7 नोव्हेंबरला ही योजना सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 500 हून अधिक शेतकर्‍यांची याचा लाभ घेतला आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा