Breaking News

सीपीईसीमुळे भारत-पाक तणाव वाढणार

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था अब्जावधी डॉलर्स खर्च करून बांधण्यात येत असलेल्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे पाकिस्तान चीनच्या पुरता कहयात जाण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिक चिघळणार आहे, असा इशारा अमेरिकेतील विचारवंतांच्या गटाने दिला आहे. 


सध्याच चीनचा पाकिस्तानवर पूर्ण प्रभाव आहे. चीनचे अनेक प्रकल्प त्या देशात असून पाकची अर्थव्यवस्था एकप्रकारे चीनवरच अवलंबून आहे. त्यात या प्रकल्पाची भर पडल्यास पाकला स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही. शिवाय पाकिस्तान चीनला दिलेला शब्द पाळू शकेल काय हाही प्रश्‍न आहे. या प्रकल्पाच्या खर्चाचा काही वाटा पाकिस्तानने उचलायचा असून तसे करण्यास तो देश सक्षम नाही. त्यामुळे भविष्यकाळात तो चीनच्या अंमलाखाली येईल. परिणामी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढणे अटळ आहे, असे मतप्रदर्शन त्यांनी आपल्या अहवालात केले आहे. 

हा प्रकल्प दिसायला प्रचंड असला तरी पाकला त्यापासून होणारा लाभ अत्यल्प असेल. या प्रकल्पातून वीजनिर्मिती होणार असली तरी पाकची एकंदर ऊर्जेची आवश्यकता भागविण्यास तो असमर्थ आहे. या प्रकल्पाला सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी करारानुसार पाकिस्तानची आहे. ती तो कितपत पार पाडू शकतो हा देखील प्रश्‍न आहे, असेही मुद्दे अहवालात उपस्थित करण्यात आले आहेत.