Breaking News

भाजप सरकार म्हणजे पोकळ घोषणाबाजीचे पेठार - खा. सुप्रिया सुळे

पुणे, दि. 03, ऑक्टोबर - केंद्रात आणि राज्यात असलेले भाजपचे सरकार हे फक्त जाहिरातबाजी करणारे आणि जनतेवर जुलूम करणारे सरकार आहे. हे सरकार सर्व सामान्य  नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना महापालिका प्रशासन कशा प्रकारे पाणी, कचरा, रस्ते यांसारख्या मूलभूत सेवा सुविधा पुरवत आहे. याबाबात प्रशासनाचे नियोजन काय आहे,  याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महापालिका हद्दीत समाविष्ट असणार्‍या अनेक गावांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या बजेटमध्ये या समाविष्ट गावांमधील विकास क ामांसाठी राखीव निधी ठेवला जात नाही. यासाठी सरकारने एक समिती स्थापन करणयाची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर झाला असून रिंग  रोडसाठी जागा संपादन करणार कधी ?, असा संतप्त प्रश्‍न उपस्थित करत शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाटत असल्याची  भावना सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन तीन वर्षांचा कालावधी होऊन गेला. मात्र कोणत्याही पातळीवर हे सरकार यशस्वी झाले नाही. कर्जमाफी ही सरकारची फसवी योजना  असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, कर्जमाफीची रक्कम दिवाळीमध्ये प्रत्येक शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होईल, अशी घोषणा सरकारने केली  होती. मात्र, अद्याप एकाही शेतकर्याच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याचा आरोपही खासदार सुळे यांनी केला. तसेच पुणे शहराची स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश केला. मात्र, त्या  प्रकल्पाचे काय झाले, असा सवाल उपस्थित करीत हे सरकार म्हणजे पोकळ घोषणाबाजीचे पेठार असल्याची टीका खा. सुळे यांनी यावेळी केली.