Breaking News

काँग्रेसने कन्हैयाच्या माध्यमातून वातावरण बिघडवले- निलंगेकर

लातूर, दि. 08, नोव्हेंबर - भारताच्या शत्रू राष्ट्राचा एजंट म्हणून काम करणारा कन्हैयाकुमार याने देशद्रोही अफजलगुरुला दिलेल्या फाशीच्या विरोधात नारेबाजी केलेली होती. याच  देशद्रोही कन्हैयाकुमार सोबत लातूर काँग्रेसचे नेते व्यासपिठावर विराजमान झाले. सदैव राष्ट्रविरोधी व राष्ट्रघातक वक्तव्य करणा-या कन्हैयाकुमार सोबत लातूर काँग्रेसचे नेते आहेत  याचा अर्थ त्यांचा स्व. विलासराव देशमुख यांच्या पुण्याईवरचा विश्‍वास उडाला आहे की काय, अशी शंका उपस्थित करुन पराभूत लातूर काँग्रेसला देशद्रोही कन्हैयाकुमार तारणार का,  असा सवाल पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केला आहे. 
व्हीएस पँथरच्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने लातूरात कन्हैयाकुमार यास निमंत्रित करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाच्या व्यासपिठावर लातूर काँग्रेसचे नेते आ. अमित देशमुख  उपस्थित रहिले. कन्हैयाकुमार याने सातत्याने देशविरोधी व राष्ट्रघातक वक्तव्य केलेले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे देशातील सामाजिक एकोपा व वातावरण बिघडू लागले आहे.  भारताच्या शत्रू राष्ट्राचा एजंट म्हणून काम करणार्या कन्हैयाकुमारला लातूरात आणून लातूरातील सर्वधर्म समभाव व सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून  येत असल्याचा आरोप त्यांनी केला.