ऊस दराबाबत शेतकरी आक्रमक, एसटीच्या काचा फोडल्या
सोलापूर : सोलापुर जिल्ह्यात ऊस दराचा तिढा अद्याप सुटला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. 5 ते 6 शेतकर्यांनी माढा तालुक्यातील रिधोरे या गावाजवळ दोन एसटी थांबवून चालकाला व प्रवाशांना खाली उतरवले व नंतर एसटीच्या काचा फोडल्या. ऊसाला 2700 रुपये भाव मिळालाच पाहिजे व कारखानदारांच्या निषेधाच्या घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.
एसटीच्या खिडकीच्या तसेच समोरील काचा व हेडलाईट फोडून या शेतकर्यांनी धूम ठोकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे काही तास कुर्डूवाडी बार्शी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर या बस पुढे मार्गस्थ झाल्या. रिधोरे येथील आर्डा पुलावर शेतक-यांनी टायर जाळत जोरदार घोषणाबाजी केली.
रिधोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ऊस दराबाबत आक्रमक पावित्र्यात आहेत. यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक ग्रामीण विरेश प्रभु यांनी या गावात एक पोलिस व्हॅन व पोलिस तैनात केले आहे. ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कारखानदार यांची बोलावलेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे माढा तालुक्यात आंदोलनाची ठिणगी पडण्यास सुरूवात झाली होती.
दिवसेंदिवस ते अधिकच पेटत आहे. शेतकरी संघटनांचे आंदोलनाचे हत्यार आणि साखर कारखानदाराचे धोरण या दोघांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी सध्या अडकले असुन यातून लवकरात लवकर सुटण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
