Breaking News

कोपरगावच्या पूर्व भागाला अजूनही विकासाची प्रतीक्षा


तालुक्याच्या पूर्व भागात पन्नास टक्के सधन तर पन्नास टक्के जिरायती भाग असलेल्या दहेगाव गणात एकूण १२ गावांचा समावेश आहे. या भागात कोल्हे गट कायम आपले वर्चस्व टिकवुन ठेवण्यात यशस्वी ठरलेला होता. कारण संजीवनी उद्योग समुहाच्या अगदी हाकेच्या अंतरावर या गणातील गावे असल्यामुळे कारखान्यावर संचालक पदासाठी या गणातील विशेषतः दहेगाव आणि करंजी गावचा विचार आजपर्यंत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी केलेला आहे. तेच काळे कारखान्याचे अंतर दूर पडत असल्याने बहुतांशी या भागाची काळे कारखान्याशी म्हणावी तितकी जरी नाळ जोडली गेली नाही. त्यामुळे कोपरगावच्या पूर्व भागाला अद्यापही विकासाची प्रतीक्षा कायम आहे.
मागील दहा वर्षे कोपरगाव तालुक्याचे आ. अशोक काळे आणि त्यांचे सुपुत्र काळे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आशुतोष काळे यांनी यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत परजणे गटाशी संधान साधत कोल्हे गटाला शह दिला आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या दोन्हीही जागांवर कब्जा केला. या गणात काही विकासकामे जरूर झाले असले तरी अजुनही या गणातील गावांना विकासाची प्रतीक्षा करावी लागत आहे. या गणात दहेगाव (बो), पढेगाव, शिरसगाव, तिळवणी, आपेगाव, ओगदी, अंचलगाव, बोलकी, गोधेगाव, करंजी, कासली, सावळगाव अशा बारा खेड्यांचा समावेश आहे. 

यात सुमारे १७ हजार मतदार आहेत. या गणाचे भाग्य असे आहे, की सलग मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत या गणातील गावांपैकी सन २००७ ते २०१२ जिल्हा परिषदेसाठी कमी लोकसंख्या असलेल्या गावातील केशवराव भवर तर २०१२ ते २०१७ साठी गोधेगावचे माधवराव सोनवणे यांची वर्णी लागलेली होती. सध्या करंजीच्या विमल आगवण यांच्याकडे धुरा आल्यामुळे तिसऱ्यांदा याच गणाला जिल्हा परिषद सदस्याचा मान मिळाला आहे. मागील निवडणुकीत अलका चरमळ यांनी या गणाचे प्रतिनिधित्व केले असून यावेळी काळे-परजणे युतीच्या वर्षा दाणे विद्यमान सदस्य आहेत. दोन्ही पंचवार्षिकला पढेगावच्या पदरात हे पद पडले असले तरी आजही गणात काही समस्या आहे तशाच कायम आहेत.

दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र त्याची पढेगाव, करंजी, गोधेगाव उपकेंद्रे, दहेगाव येथील पशु वैद्यकीय दवाखाना मराठी शाळांचा उंचावलेला दर्जा या जमेच्या बाजू सोडल्या तर आजही या गणातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिरसगावला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची केंद्राची गरज भासत आहे. याशिवाय आहे त्या उपकेंद्रात रिक्त पदांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. तीच अवस्था पशुवैद्यकीय दवाखान्याची आहे. दहेगावच्या एकाच पशुवैद्यकीय दवाखान्याला एकूण सतरा गावांची नाळ जोडली आहे. 

तेथेही एक पद बऱ्याच वर्षापासून रिक्त असल्याने एका कर्मचाऱ्याची ओढाताण होत आहे. मागील दोन महीन्यात खुद्द दहेगावच्या आठ गायी दगावला. त्यामुळे गणातील पढेगाव येथे त्याचे उपकेंद्र होणे अत्यंत गरजेचे असूनही त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न जरूर झाले असले तरी अजुनही बहुतांशी शाळांना वॉलकंपाउंड आणि विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. गणातील गावांना जोडणारी रस्त्यांची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे, की त्यांना अनेक वर्षापासून डांबरीकरणाची ओढ लागल्याचे दिसून येते. स्मशानभूमी विकासाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक गावे पाटपाणी आणि कोळनदी लगत असूनही पाणीपुरवठा योजनाच नसल्याने महिलांच्या नशिबी पाण्यासाठीची वणवण त्यांच्या पाचवीला पुजलेली आहे.

पायाभूत सुविधांबरोबरच या बारा खेड्यांना पालखेड डावा कालवा वरदान ठरू शकतो. कारण सर्वच गावांना का कालवा संजीवनी देणारा ठरत असला तरी त्याला वेळोवेळी आवर्तन येण्यासाठी आजपर्यंत राजकीय पक्षांनी तथा पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी केलेले आंदोलन वगळता इतर वेळी कणखर भूमिका न घेतल्याने काही गावे अजुनही टँकरमुक्त झालेली नाहीत. सिंचनाअभावी बऱ्याच गावांना रब्बीच्या पिकांना फटका बसतो. या परिसरात उपबाजार समितीची स्थापना करण्याची शेतकऱ्यांची तीव्र इच्छा असूनही त्यावर मात्र अजून कुठलीही चर्चा होताना दिसून येत नाही.