… तर तीव्र आंदोलन करणार : भोईटे
राहुरी प्रतिनिधी - राज्यातील अनुदानित वसतिगृहांचे प्रश्न आठ दिवसात सोडविला जाईल, असा शब्द राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे यांनी दिला असल्याची माहिती वसतीगृह महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब भोईटे यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालविल्या जाणाऱ्या २ हजार ३८८वसतिगृहांपैकी संस्था वसतिगृहांचे सर्व प्रकारचे अनुदान व कर्मचारी मानधन सन २०१६-१७ पासून थकित असल्याने त्यांच्याकडील मूळ मान्यतेच्या कागदपत्रांची पडताळणी व विविध स्तरावरील सर्व प्रकारच्या सुनावण्या पूर्ण झालेल्या असतांनाही अनुदान व कर्मचारी मानधन थकीत आहे.
दरम्यान, हा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भोईटे म्हणाले, हा प्रश्न हा डिसेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात सोडवू, असे आश्वासन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत दिले. यावेळी वसतीगृह संघटनेचे सचिव अशोक शहा, शांतु डोळस, संघराज रुपवते, डि. एम. सोनवणे, देवराम मुंढे, दत्ता पाटील, आयुब शेख, सतीश गोटमुकले, विजयकुमार साळवे, पिचड मॅडम, चौधरी, सुर्योधन पवार आदी घेराव अंदोलनात सहभागी झाले होते. याप्रसंगी संस्था व वसतीगृह कर्मचारी यांच्या अडचणी संदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनाही देण्यात आल्याचे भोईटे यांनी सांगितले.