Breaking News

मंडणगडमध्ये वाहतूक व्यावसायिकाचा खून

रत्नागिरी, दि. 02, नोव्हेंबर - वेरळ (ता. मंडणगड) येथील खासगी वाहतूक (वडाप) व्यावसायिक राजाराम बाळकृष्ण चव्हाण (वय 45) यांचा तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी काल  (दि. 31 ऑक्टोबर) दिवसभरात धारदार शस्त्राने खून केल्याचे आज स्पष्ट झाले. यासंदर्भात चव्हाण यांची पत्नी दीपेश्री राजाराम चव्हाण (वय 43) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात  आज पहाटे सकाळी पाच वाजता तक्रार दाखल केली.
प्रथमदर्शनी हा खून चोरीच्या उद्देशाने केला असल्याचे भासवण्यात आले असले तरी खून नेमका कोणत्या कारणांसाठी करण्यात आला असेल, याचा तपास मंडणगड पोलीस करीत  आहेत. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार राजाराम चव्हाण यांचा प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय होता. तोंडली ते दापोली या मार्गावर वडापचा व्यवसाय करीत असत.  काल सकाळी अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून प्रवासी भाडे सोडण्याकरिता बोलावून घेतले होते. त्यांना घेऊन जाण्यासाठी अज्ञात मोटारसायकलस्वार त्यांच्या घरी पोहोचले व  त्यांना भाड्यासाठी सोबत घेऊन गेले. भाड्यासाठी गेल्यानंतर उशिरापर्यंत ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता, उन्हवरे ते तोंडली मार्गावर  पुलाच्याजवळ त्यांची गाडी आढळून आली. चव्हाण शोध घेत असताना या पुलाच्या मोरीच्या आत खाली धारधार तीक्ष्ण हत्याराने शरीरावर अनेक ठिकाणी जबर दुखापती करून  जीवे ठार मारून टाकण्यात आलेला त्यांचा देह आढळून आला. घटनास्थळी त्यांची गाडी आढळून आली असली तरी अज्ञातांनी चव्हाण यांचे दोन मोबाइल व सोनसाखळी असा 48  हजाराचा ऐवज खून करून लांबविला असल्याची बाब पुढे आली. अज्ञातांनी केलेला खून हा चोरीच्या उद्देशाने केला असल्याचे भासवण्यात आले असले तरी चोरीच्या उद्देशानेच हा  खून करण्यात आला होता की, अन्य कारणासाठी याचा तपास पोलीस करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे यांनी आपल्या पथकासह आज मंडणगड येथे घटनास्थळी भेट दिली अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरू असून चव्हाण यांचे शवविच्छेदन दापोली येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मंडणगड पोलीस ठाण्याच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.