Breaking News

जागतिक अहिंसा दिनानिमित्त ’शांती मार्च’चे आयोजन

पुणे, दि. 03, ऑक्टोबर - महात्मा गांधी यांचा जन्मदिन हा ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरात आज सकाळी ‘शांती मार्च’चे  आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ आणि ’युवक क्रांती दल’ यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ’शांती मार्च’चा  शनिवारवाडा येथे ’थाळीनाद’ करत समारोप करण्यात आला.
याप्रसंगी जाहेदभाई, चित्रलेखा जेम्स हे धर्मगुरू शांती मार्चमध्ये सहभागी झाले. तर संदीप बर्वे, अप्पा अनारसे, श्रीपाद ललवाणी, मयुरी शिंदे, यल्लपा धोत्रे, सचिन  पांडोळे, अजय हाप्पे, अतुल पोटफोडे, जांभुवंत मनोहर आदी कार्यकर्त्यांनी शांतीमार्चचे संयोजन केले. माहेर संस्थेचे सदस्य, ’कोपरे गाव’ चे ग्रामस्थ, मोहोळ  विद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
चित्रलेखा जेम्स म्हणाल्या, ’हिंसामुक्त समाज हा प्रत्येक नागरिकाला अपेक्षित आहे. परंतु दुर्देवाने समाजातील काही घटकांच्या अविचारी कृत्यांमधून समाजातील  शांतता ढळते. अशावेळी महात्मा गांधीचे विचार समाजात रुजण्याची आवश्यकता लक्षात येते. त्या दृष्टीने महात्मा गांधींच्या विचारांचे स्मरण व्हावे म्हणून 2  ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन हा दिवस जगभर ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जात असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना संदीप बर्वे म्हणाले, ’भारतीय राज्य घटनेवर निष्ठा असणार्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन दंगलमुक्त समाजासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे.  यासाठी हा ’शांती मार्च’ आयोजित करण्यात आला होता. पुणे शहर दंगलमुक्त राखण्याचा आमचा संकल्प व ठाम निर्धार आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.