Breaking News

नाल्या व रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी किनगाव राजा येथील महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप!

बुलडाणा, दि. 27, ऑक्टोबर - ऐन दिवाळीच्या सुरुवातीला गावात नळाच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला व बसस्थानक ते पोलीस स्टेशन हा गावातील मुख्य रस्ता पूर्णपणे खराब  झाला असून, या रस्त्यावरील नाल्या गाळाने भरल्यामुळे या नाल्यातून पाणी हे या रोडवर येत असल्यामुळे रोडला खड्डे पडून पाण्याचे मोठमोठाले तळे साचले आहे. त्यामुळे गावातील  महिलांच्या संयमाचा बांध फुटून त्याचा उद्रेक झाला व महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. 
किनगाव राजा येथील सोमवारी होणारी ग्रामसभा कोरमअभावी तहकूब झाल्यामुळे ग्राम सभेचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांनी हजर राहावे,  अशी दवंडीही देण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात गावातील महिलांनी, मोठया प्रमाणावर हजेरी लावली; परंतु ग्राम सभा सुरू होण्यापूर्वीच विकास कामाच्या  वेगवेगळ्या विषयांवर ग्रामपंचायत कार्यालयात जमलेल्या नागरिकांनी व महिलांनी सरपंच व सचिव यांच्यासोबत चर्चेला सुरुवात केली. या चर्चेतून नळाच्या पाण्याचा प्रश्‍न, नाल्यांचा  प्रश्‍न, रस्त्याचा प्रश्‍न, या तीन विषयांवर मोठया प्रमाणावर नागरिकांनी व महिलांनी आक्रोश व्यक्त केला. या संपूर्ण चर्चेला एक हिंसक वळण मिळाले. त्यामुळे गावातील महिलांची व  नागरिकांची सरपंच व सचिव यांच्या सोबत बाचाबाची झाली.
नाल्या गाळाने भरल्यामुळे या नाल्यातून पाणी हे या रोडवर येत असल्यामुळे रोडला खड्डे पडून पाण्याचे मोठमोठाले तळे साचले आहे. त्यामुळे गावातील महिलांच्या संयमाचा बांध फु टून त्याचा उद्रेक झाला व महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. त्यामुळे हा सर्व प्रकार पाहून ग्रामपंचायत सचिवांनी पोलिसांना पाचारण केले. किनगाव राजा पोलीस  स्टेशनचे दुय्यम ठाणेदार किशोर शेरकी व कर्मचारी लगेच घटनास्थळी उपस्थित झाले व दुय्यम ठाणेदारांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित असलेल्या महिला व नागरिकांना समजविण्याचा  प्रयत्न केला; परंतु महिला व नागरिकांचा रोष एवढा होता की, कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यामुळे दुय्यम ठाणेदार किशोर शेरकी यांनी प्रसंगावधान राखून  ग्रामपंचायत सचिवांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले; परंतु या संपूर्ण प्रकाराचा उद्रेक एवढा झाला होता की, महिला व नागरिकांनी त्यांच्या मागेच गावच्या विकासाच्या घोषणा देत  पोलीस स्टेशन गाठले व या संपूर्ण घटनेबद्दल पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांना सांगितले.
या संपूर्ण घडलेल्या विषयावर गावातील महिला व नागरिकांसोबत चर्चा करून पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे व तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर मांटे यांनी महिला व नागरिकांसोबत व  सरपंच, सदस्य व सचिवासोबत मध्यस्थी करून वाद मिटविला. पुढील ग्रामसभेची तारीख व वेळ निश्‍चित करून येत्या ग्रामसभेत विकास कामाच्या संदर्भात धोरण निश्‍चित करण्यात  येईल, असे आश्‍वासन ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आले व महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला लावलेल्या कुलुपाची चावी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या हस्ते स चिवांना देण्यात आली.