Breaking News

ठाण्यात सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार निदर्शने

ठाणे, दि. 01, नोव्हेंबर - भारतीय जनता पक्ष सरकारच्या कारकिर्दीला तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे मोठ्या प्रमाणात झाले  असल्याचा आरोप करीत आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या  नेतृत्वाखाली वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान, देशात आणि राज्यात सध्या अराजकता माजली असून सर्वच संकटांनी जनता हैराण झाली आहे. त्यामुळे जसे  इंग्रजांना गो बॅक म्हणत हाकलून लावले हेते. आता या सरकारलाही जनताच गो बॅक करणार आहे, असे यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले.
फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करुन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रामध्ये शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत; चिक्की- भूखंड घोटाळे, लहान  अर्भकांचे मृत्यू ; महिलांवरील अत्याचार आदी प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकाराला भाजप- शिवसेना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.