Breaking News

देशातील नेत्रबधितांची गणना होणार, नागपुरातील ’सक्षम’ राबवणार अभियान

नागपूर, दि. 03, सप्टेंबर - देशात कॉर्नियामुळे होणार्‍या नेत्रहीनतेचे प्रमाण खूप आहे. नेत्रदानाच्या माध्यमातून त्यावर मात करणे शक्य आहे. परंतु, देशात नेमके  नेत्रहीन किती, याची अधिकृत आकडेवारीच उपलब्ध नाही. यासाठी नागपुरातील सक्षम या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेतर्फे ’’कॉर्निआ अंधत्व मुक्त  भारत अभियान’’ अर्थात कांबा राबविले जाणार आहे. देशभरातील शाखांच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन दृष्टिबाधितांची नेमकी सखोल माहिती जमा करण्यात येणार  आहे. सक्षमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिरीष दारव्हेकर यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात बोलताना दारव्हेकर यांनी सांगितले की, ‘कॉर्निया’ खराब झाल्यामुळे अनेकांचे जीवन अंधकारमय होते. परत प्रकाशपेरणीसाठी दुसर्‍या व्यक्तीच्या डोळ्याचा  ‘कॉर्निया’ बसवावा लागतो. त्यासाठी त्या प्रमाणात नेत्रदानाची आवश्यकता असते. आपल्या देशात नेत्रदानाच्या प्रमाणात अजूनही हवी तशी वाढ झालेली नाही.  दुसरीकडे ‘कॉर्नियल’ अंधत्व आलेल्यांच्या आकडेवारीबाबत विविध संस्था आणि तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. कुणी ही संख्या 12 लाख सांगत आहेत तर कुणी 35  लाख. त्यामुळे देशात नेमक्या किती जणांना नेत्रदान हवे याबाबत संभ्रम आहे. याबाबतच ‘सक्षम’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. ‘सक्षम’चे देशभरात 360  जिल्ह्यांत काम चालते. या ‘नेटवर्क’मुळे देशभरात सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुरुवातीला 6 जिल्ह्यांत ‘पायलट प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. यात मेहबूबनगर (तेलंगणा), जबलपूर (मध्य प्रदेश), कर्नाल (हरियाणा), जयपूर (राजस्थान), नवी  दिल्ली आणि नागपूर या जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. 2020 पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांत सर्व्हेक्षण करण्याचा ‘सक्षम’चा मानस आहे. या  सर्व्हेक्षणातील विस्तृत अहवाल केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाला सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर नेत्रदानाला चालना देण्यासंदर्भात पुढील रुपरेषा तयार  करण्याची पावले उचलण्यात येण्याची शक्यता आहे.नेत्रदानाचे प्रमाण वाढण्याची आवश्यकता देशात नेत्ररोगांचे प्रमाण वेगवेगळे आहे. मात्र याची कुठलीच सखोल  आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळेच ‘सक्षम’ने सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात नेत्रदानाचे प्रमाण फार कमी आहे. ते वाढविण्याची आवश्यकता आहे.  यासाठीच सक्षमचे प्रयत्न सुरू असल्याचे दारव्हेकर यांनी सांगितले.